सफाई कर्मचार्‍यांचे पुनर्वसन त्याच विभागात करा = १३ मे रोजी धरणे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सफाई कर्मचार्‍यांचे पुनर्वसन त्याच विभागात करा = १३ मे रोजी धरणे

Share This
मुंबई : धोकादायक इमारतींमध्ये राहणार्‍या महापालिकेच्या सफाई कर्मचार्‍यांचे पुनर्वसन ते राहत असलेल्या विभागात करण्याचे आश्‍वासन पालिका प्रशासनाने तत्काळ पूर्ण केले नाही तर मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी आपल्या कुटुंबीयांसमवेत १३ मे रोजी आझाद मैदानात धरणे आंदोलन तसेच निदर्शने करतील, असा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनने दिला आहे. 

युनियनचे कार्याध्यक्ष अँड़ नवनाथ महारनवर यांनी सांगितले, डॉकयार्डची दुर्घटना झाल्यानंतर पालिकेने कामगारांसाठी बांधलेल्या सर्व वसाहतींच्या इमारती धोकादायक असल्याचे जाहीर करून तेथील कर्मचार्‍यांना चेंबूर माहूल येथे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आणि इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले. पण पर्यायी व्यवस्था लांब असल्यामुळे गैरसोयीची ठरत आहे, यामुळे कर्मचार्‍यांनी तेथे जाण्यास नकार दिला. याविरोधात कर्मचार्‍यांनी महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करून पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांच्याशी यासंदर्भात चर्चा करण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार ४ डिसेंबर रोजी यावर चर्चा होऊन कर्मचार्‍यांना माहूल येथे न पाठवता ते राहत असलेल्या विभागातच त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येईल आणि आवश्यकता वाटल्यास त्यांच्यासाठी संक्रमण शिबिरे बांधण्यात येतील, असे अतिरिक्त आयुक्तांनी मान्य केले होते. पण प्रशासनाने मान्य करूनही अद्याप एकाही संक्रमण शिबिराचे काम सुरू झालेले नाही. पावसाळा तोंडावर आला असल्यामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच पर्यायी व्यवस्था न करता माहूल येथे जाण्यासाठी कर्मचार्‍यांना धमकावले जात आहे. यामुळे कर्मचार्‍यांत तीव्र असंतोष पसरला असून याविरोधात १३ मे रोजी आझाद मैदानात धरणे धरण्यात येईल, अशी माहिती महारनवर यांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages