कोकण रेल्वेने हात झटकले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कोकण रेल्वेने हात झटकले

Share This
अलिबाग : दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला रविवारी झालेल्या अपघाताचे कोकण रेल्वेला कोणतेच सोयरसुतक नसल्याचे समोर आले आहे. हा अपघात मध्य रेल्वेच्या मार्गावर झाला असल्याचे सांगून कोकण रेल्वेने हात झटकले आहेत. दुसरीकडे मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेत समन्वय नसल्याची कबुली खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

रविवारी सकाळी नागोठणे नजीक निडीगावाजवळ दिवा-सावंतवाडी पॅसेंजर गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात २२ जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर शेकडो जखमी झाले. यासंदर्भात अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी कोकण रेल्वेकडे संपर्क साधला असता हा अपघात मध्य रेल्वेच्या रुळांवर झाला आहे. त्यामुळे अपघाताची कारणेही मध्य रेल्वेच सांगू शकेल. आम्ही काहीही सांगू शकणार नाही, असे उत्तर कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी दिले.

कोकण रेल्वेच्या या भूमिकेमुळे प्रवासी वर्गात संभ्रमाचे वातावरण असून कमालीचा संताप व्यक्त होत आहे. कोकण रेल्वेच्या बाबतीत असा अनुभव रायगडकरांना अनेकदा आला आहे. मग तो अपघाताच्या वेळी असो किंवा या प्रकल्पासाठी आपल्या जमिनी देणार्‍या शेतकर्‍यांच्या समस्या असो, कोकण रेल्वेने नेहमीच टोलवाटोलवीची भूमिका घेतल्याचा अनुभव रायगडकरांनी घेतला आहे. कोकण रेल्वे हे स्वतंत्र प्राधिकरण असल्याने कोकण रेल्वेलाही मध्य रेल्वेकडून सापत्नभावाची वागणूक मिळताना दिसते. कोकण रेल्वेच्या गाड्या मध्य रेल्वेच्या हद्दीत आल्यावर त्यांना साईड ट्रॅकला टाकले जाते. प्रथम मध्य रेल्वेच्या गाड्यांना जाऊ दिले जाते, असाही अनुभव कोकण रेल्वे प्रवाशांना येतो आहे. हा अपघात मध्य रेल्वेच्या रुळांवर झाला असला तरी कोकण रेल्वेची काहीच जबाबदारी नाही का? असा सवाल आ. भरत गोगावले यांनी उपस्थित केला आहे. कोकण रेल्वेच्या या भूमिकेचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages