माहूल परिसरातील दोन रासायनिक कंपन्यांना लवादाची नोटीस - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

माहूल परिसरातील दोन रासायनिक कंपन्यांना लवादाची नोटीस

Share This
मुंबई - चेंबूरनजीक माहूल आणि अंबापाडा परिसरातील रासायनिक कंपन्यांमधून होणाऱ्या वायुगळतीमुळे लोकांना त्रास होत असल्याने तेथील दोन कंपन्यांना नोटिसा पाठवून स्पष्टीकरण देण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे. 

"सीलॉर्ड कंटेनर्स लिमिटेड' आणि "एजीस केमिकल' या कंपन्यांचे माहूल आणि अंबापाडा नजीकच्या वस्त्यांजवळ दहा केमिकलचे कंटेनर आहेत. ते व्यवस्थित बंद केले जात नाहीत. त्यामुळे त्यातून होणाऱ्या वायुगळतीचा त्रास होत असल्याच्या तक्रारी रहिवाशांनी केल्या होत्या. कंटेनरच्या झाकणातून रसायनाच्या वाफा सतत बाहेर येतात. कंटेनरमधून टॅंकरमध्ये रसायन भरतानाही अशा वाफा येत असतात. त्या हवेत मिसळत असल्याने हवा दूषित होऊन लोकांना त्रास होतो. यासंदर्भात रहिवाशांनी सरकारी अधिकाऱ्यांकडेही तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्यानंतरही या कंपन्यांवर कारवाई झाली नाही. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी केवळ तपासणी करून निघून जातात.

डोळे लाल होणे, घसा सुजणे, लालसर पुरळ येणे, घसा व डोळे चुरचुरणे, मळमळणे, डोकेदुखी असा त्रास लोकांना होत असल्याचे आढळले. त्यामुळे याविषयी योग्य खबरदारी घेण्यास महापालिकेने कंपन्यांना सांगितले होते. तरीही परिस्थितीत काही फरक न पडल्याने रहिवाशांनी ऍड. असीम सरोदे व गजेंद्र वैती यांच्यामार्फत राष्ट्रीय हरित लवादाकडे (नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल) तक्रार केली. 

38 प्रकारच्या रसायनांचा साठा करणाऱ्या या कंपन्यांच्या टॅंकरमध्ये ऍसिटोन, ऍनिलाईन, बेंझेन, मिथेनॉल, इथेनॉल, ऑर्थोझायलीन, हेक्‍सोनॉन अशा 75 कोटी लिटर रसायनांचा साठा केला जातो. त्यातून वायुगळती होते, अशा लोकांच्या तक्रारी होत्या. यासंदर्भात लवादाच्या पुणे येथील खंडपीठापुढे 4 एप्रिल रोजी तक्रार केल्यावर खंडपीठाने या प्रकरणी कंपन्यांना नोटिसा देऊन पुढील सुनावणी 12 मे रोजी ठेवली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages