नववीचा वर्ग नापासाच्या फेऱ्यात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नववीचा वर्ग नापासाच्या फेऱ्यात

Share This
शिक्षण हक्क कायदानुसार विद्यार्थ्यांवरील परीक्षांचे ओझे कमी झाले खरे पण, त्यासाठी आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास न करण्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. याचा फटका नववीतील विद्यार्थ्यांना बसू लागला आहे. मुंबईतील अनेक शाळांतील नववीतले १५ ते २० टक्के विद्यार्थी नापास होत आहेत. इंग्रजी माध्यमातील नापास विद्यार्थ्यांचा आकडा १२ टक्क्यांवर असून, प्रादेशिक भाषांमधील नापासांचे प्रमाण ४ ते ५ टक्क्यांवर असल्याचे सांगण्यात येते.

मुंबईतील शाळांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक शाळांतील नववीतील विद्यार्थ्यांचे निकाल धक्कादायक लागत असल्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे. परीक्षांमुळे विद्यार्थ्यांवर येणारा ताण लक्षात घेता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास करू नये, असा नियम करण्यात आला. आठवीपर्यंतच्या इयत्तांतील विद्यार्थी नापास झाल्यास १५ दिवसांत त्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचा नियम आहे. मात्र, नववीतील विद्यार्थ्यांसाठी असा नियम नसल्याने या विद्यार्थ्यांना परीक्षेची एकच संधी मिळते. त्यामुळेच नववीतील विद्यार्थ्यांचे नापासाचे प्रमाण वाढत असल्याचे अनेक मुख्याध्यापक सांगतात. यंदा नववीतील विद्यार्थ्यांचे नापासांचे प्रमाण १५ ते २० टक्के असून, गेल्यावर्षी हेच प्रमाण २० ते २५ टक्क्यांच्या घरात असल्याची कबुली मुख्याध्यापकांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, यंदाच्या वर्षी ​शालेय शिक्षण विभागाने तुकड्यासंदर्भात केलेल्या नव्या निर्णयामुळे अनेक शाळा प्रशासनांनी आपली तुकडी टिकून राहण्यासाठी प्रयत्न केले असल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा नववीतील विद्यार्थ्यांची नापास होण्याची संख्या कमी असल्याचे सांगण्यात आले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages