मुंबई - आपल्या हक्क अधिकारासाठी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी निदर्शने करणे हा गुन्हा नाही. मात्र पोलीस दडपशाहीने अशी आंदोलने संपवून टाकत असल्याने खरे नक्षलवादी तर पोलीस आहेत. अशी खरमरीत टीका ज्येष्ठ अभिनेते, साहित्यिक गिरीश कर्नाड यांनी केली लोकवाङ्मय गृह आणि कबीर कलामंच डिफेन्स कमिटीने सचिन माळी याच्या ‘सध्या पत्ता भूमिगत’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन केले त्यावेळी कर्नाड यांनी अशी टीका केली.
मी कवीला ओळखत नाही, पण त्याच्यावर झालेल्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी इथे आलो, आज कायदा हा न्यायव्यवस्थे ऐवजी पोलिसांकडूनच स्वत:ला हवा तसा राबवला जात आहे असे कर्नाड म्हणाले. सचिन माळी याच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन त्याच्या अनुपस्थितीत करताना एकाच वेळी दु:ख आणि आनंद अशा संमिश्र भावना आहेत असेही कर्नाड म्हणाले.
नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली कबीर कलामंचचे सचिन माळी सध्या तुरुंगात आहेत. त्याची पत्नी शीतल साठे यांनी जातीअंत सांस्कृतिक क्रंातीचा लढा असाच सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. सचिन माळी याने पत्रातून आपल्या भावना व्यक्त केल्या. माझे विचार नक्षलवादी नाहीत. मी कुठलाही गुन्हा केलेला नाही. आज एवढ्या मोठ्या मंडळींच्या उपस्थितीत माझ्या कवितासंग्रहाचे प्रकाशन होत आहे. हे लोकशाही जिवंत असल्याचे द्योतक असल्याचे सचिनने पत्रातून सांगितले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक-शहा, ऍड. मिहीर देसाई, संभाजी भगत, प्रकाश रेड्डी आदी उपस्थित होते.

