मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) मुंबईकर जनतेने निवडून दिलेल्या नगरसेवकांनी पालिकेत नागरी समस्यांबद्दल प्रशासनाला धारेवर धरले पाहिजे, अशी सर्वसामान्य मुंबईकरांची अपेक्षा असते; पण निवडून आल्यापासून गेल्या दोन वर्षांत एकही प्रश्न न विचारणारे ७ मौनी नगरसेवकही मुंबई महानगर पालिकेत असून २२७ पैकी १९ नगरसेवकांनी पालिकेच्या प्रभाग समितीच्या बैठकीतही जनतेच्या प्रश्नांबाबत कोणतेही प्रश्न विचारले नसल्याचे सन २०१३ च्या प्रजा फाउंडेशनचा अहवालात म्हटले आहे.
मुंबई महानगर पालिकेमध्ये अनिता यादव (काँग्रेस), ललिता अण्णामलाई (काँग्रेस), फैयाज खान (काँग्रेस), श्वेता राणे आणि विश्वास शिंदे (दोघीही शिवसेना), ज्योत्स्ना परमार (समाजवादी पक्ष), उज्ज्वला मोडक (भाजपा), हनिफाबी (अपक्ष). या सात नगरसेवकांनी सन २०१३ मध्ये एकही प्रश्न विचारला नसल्याचे प्रजाच्या अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे, उज्वला मोडक यांनी गेल्या दोन वर्षांत एकही प्रश्न विचारला नसताना भारतीय जनता पक्षाने त्यांना यावर्षी पालिकेच्या सुधार समितीचे अध्यक्षपद बनवले आहे.
सर्वाधिक प्रश्न शिवसेनेचे सर्वाधिक प्रश्न विचारणार्या पक्षांमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांचा समावेश आहे. शिवसेना नगरसेवकांनी ३२५, काँग्रेस नगरसेवकांनी २0३, भाजपा नगरसेवकांनी १४७, तर मनसे नगरसेवकांनी १३३ प्रश्न विचारले. त्यातही शिवसेनेच्या नगरसेविका हेमांगी वरळीकर यांनी ४0 प्रश्न विचारले असल्याचे प्रजाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

