मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'मुंबई मेट्रो'चे उद्घाटन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'मुंबई मेट्रो'चे उद्घाटन

Share This
मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comगेल्या कित्येक वर्षांपासून मुंबईकर चातकासारखी वाट पाहत असलेल्या ‘मुंबई मेट्रो‘चे आज (रविवार) अखेर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी वर्सोवा स्थानकावर मेट्रोला हिरवा झेंडा दाखविला. 
घाटकोपर येथे प्रवास करून पोहचलेले मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, ‘‘मेट्रो प्रकल्प पूर्ण करताना अनेक अडचणी आल्या, पण अखेर मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. तिकीट दरावरून सुरू असलेले मतभेद रिलायन्सशी चर्चा करून व करारानुसार सोडविण्यात येतील. अनेक आव्हाने स्वीकारत मेट्रो प्रकल्प सत्यात उतरला आहे. या प्रकल्पाचे नाव मुंबई मेट्रो असेच असणार आहे.‘‘ उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल अंबानी, टिना अंबानी, मंत्री जयंत पाटील, खासदार गजानन किर्तीकर, किरीट सोमय्या, पूनम महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. 

विधीवत पूजा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह सर्वांनी मेट्रोतून प्रवास केला. मेट्रोच्या प्रवास भाड्यावरून वाद सुरूच असून, राज्य सरकारने मात्र मुंबई मेट्रोवन प्रायव्हेट लिमिटेडच्या (एमएमओपीएल) मनमानीपणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या मेट्रोच्या प्रवासी भाड्याविषयी राज्य सरकारसोबत सुरू असलेला वाद संपलेला नसतानाच कंपनीने स्वतःहून तिकिटांचे दर दहा ते 40 रुपयांपर्यंत जाहीर करून रविवारी दुपारी एक वाजता जनतेसाठी मेट्रो सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दुसरीकडे, "मुंबई मेट्रो‘ असे अधिकृत नाव असतानाही अनेक ठिकाणी "रिलायन्स मेट्रो‘ असेच नाव झळकत आहे, त्यामुळे हा प्रकल्प "रिलायन्स इन्फ्रा‘ने अक्षरशः "हायजॅक‘ केल्याची स्थिती आहे. 

हा संपूर्ण वाद मेट्रोच्या तिकीट दरावरून उभा राहिला आहे. राज्य सरकारच्या अखत्यारीतील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आखणी केलेला हा प्रकल्प सार्वजनिक- खासगी भागीदारी तत्त्वावरील (पीपीपी) आहे. त्यासाठी "एमएमओपीएल‘ या कंपनीची स्थापना करण्यात आली. त्यात "रिलायन्स इन्फ्रा‘ची 69 टक्के, एमएमआरडीएची 25 टक्के, तर व्हेओलिया ट्रान्स्पोर्टची सहा टक्के भागीदारी आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकार आणि या कंपनीमध्ये 2007 मध्ये सवलत करारनामा झाला होता. त्यानुसार, या मेट्रोचे तिकीट बेस्ट बसच्या प्रवासी भाड्याच्या दीडपट ठेवण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे सरकारने गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये किमान 9 ते कमाल 13 रुपयांचे प्रवासी भाडे अधिसूचितही केले होते. परंतु, प्रकल्पाचा मूळ अंदाजित खर्च दोन हजार 356 कोटी रुपये असताना तो वाढून चार हजार 321 कोटी रुपये झाला असल्याने तिकीट दराचीही फेररचना करा, अशी कंपनीची मागणी होती. ती सरकारने वारंवार फेटाळून लावली होती. मात्र, नोव्हेंबर 2013मध्ये केंद्र सरकारने या प्रकल्पाला आधीच्या "ट्रामवेज ऍक्‍ट‘ऐवजी "मेट्रो ऍक्‍ट‘ लागू केला. 

या कायद्यातील कलम 33 अन्वये सुरवातीचे दर ठरविण्याचे अधिकार "प्रशासक‘ या नात्याने आम्हाला मिळाले आहेत, अशी भूमिका कंपनीने अलीकडच्या काळात घेतली. तथापि, "सवलत करारनामा महत्त्वाचा असल्याने कंपनीला मनमानी पद्धतीने तसे करता येणार नाही आणि तिकीट दरांची फेररचना करायची असली तरी ती मेट्रो कायद्याच्या कलम 34 अन्वये दरनिश्‍चिती समितीच्या मान्यतेनेच करावी लागेल‘, अशी भूमिका सरकारने घेतली होती. याविषयी अंतिम तोडगा निघालेला नसतानाच मेट्रोसेवा सुरू करण्याविषयीच्या सर्व मंजुरी हातात आल्याने कंपनीने काही दिवसांपूर्वी नवी दरसूची जाहीर केली. शिवाय, आज त्याआधारेच मेट्रोसेवा सुरू करत असल्याची घोषणाही "एमएमओपीएल‘चे संचालक देबाशिष मोहंती व मुख्य कार्यकारी अधिकारी अभय मिश्रा यांनी डी. एन. नगर कारडेपोमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली होती.

‘रिलायन्स इन्फ्रा‘ची अशीही दादागिरी - प्रकल्प राज्य सरकारचा असतानाही कंपनीने पूर्वी "रिलायन्स मेट्रो‘ असे लोगो मेट्रो गाड्यांवर आणि स्थानकांवर लावले होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निर्देशांनंतर कंपनीने हे लोगो "मुंबई मेट्रो‘ असे बदलले; परंतु आजही काही गाड्यांवर "रिलायन्स मेट्रो‘ असाच लोगो झळकत आहे.
- मेट्रोच्या स्थानकांमधील "एएफसी‘ मशिन, "फेयर डिस्प्ले मशिन‘, "डिस्प्ले बोर्ड‘ अशा विविध ठिकाणीही "रिलायन्स मेट्रो‘ असाच लोगो झळकताना दिसत आहे.
- सर्व मेट्रो स्थानकांबाहेर लावलेल्या फलकांमध्ये "मुंबई मेट्रो‘च्या लोगोसोबत कंपनीने आपल्या नावासोबत एमएमआरडीएचे नाव नमूद केले आहे; परंतु यातही "रिलायन्स‘चेच नाव ठळकपणे दिसत आहे.
- इतकेच नव्हे, तर कालपर्यंत "मुंबई मेट्रो वन‘ या नावाने असलेली अधिकृत वेबसाइटही आता "रिलायन्स मुंबई मेट्रो‘ या नावाने दिसत आहे.

श्रेयवादाचे राजकारण राज्य सरकारशी झालेल्या करारानुसारच रिलायन्सला तिकीट आकारणी करता येणार आहे. त्यापेक्षा अधिक भाडे आकारणी केल्यास राज्य सरकार ही दरवाढ कदापि मान्य करणार नाही. त्याविरोधात न्यायालयात धाव घेतल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी तिकिटाचे दर 8, 10 आणि 12 रुपये केल्यास त्यांचा जाहीर सत्कार करू. मात्र, मुख्यमंत्री भाजपवर आरोप करून कातडी बचावाचा प्रयत्न करत आहेत, असे प्रत्युत्तर भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिले आहे. मेट्रोचे श्रेय घेण्यावरून भाजप आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते घाटकोपर येथे आमने-सामने आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी झाली. या वेळी भाजपचे खासदार किरीट सोमय्या आणि गोपाळ शेट्टी यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले.

मेट्रोची वैशिष्ट्ये - दररोज पहाटे 5.30 ते मध्यरात्री 12 पर्यंत मेट्रो धावणार.
- दररोज सर्वसाधारणपणे 270 ते 287 मेट्रो फेऱ्या.
- दीड ते दोन तासांचा प्रवास अवघ्या 21 मिनिटांत.
- वर्सोवा ते घाटकोपरदरम्यानच्या रस्त्यावरील प्रवासातील तब्बल 45 ट्रॅफिक सिग्नल टळणार.
- सकाळी 8.30 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 8.30 या वर्दळीच्या वेळेत दर चार मिनिटांनी ट्रेन.
- वर्दळ कमी असलेल्या उर्वरित कालावधीत दर आठ मिनिटांनी एक ट्रेन.
- 11.4 किलोमीटर मार्गावर 12 स्थानके.
- सर्व स्थानकांत 95 एस्केलेटर, 45 एलिव्हेटर आणि 137 जिने.
- धावणार 16 मेट्रो ट्रेन.
- एका डब्यात 375 प्रवासी आणि मेट्रो गाडीत दीड हजार प्रवासी वाहून नेण्याची क्षमता.
- सर्व मेट्रो गाड्यांत शंभराहून अधिक "एलसीडी‘ टीव्ही.
- संकटप्रसंगी थेट मेट्रो पायलटशी बोलण्याची सोय.
- मेट्रो ट्रेन व स्थानकांवर "सीसीटीव्ही‘ कॅमेऱ्यांची सतत नजर.

मेट्रोचा असा आहे मार्ग : वर्सोवा- डी. एन. नगर- आझाद नगर- अंधेरी- डब्ल्यूईएच- चकाला (जेबी नगर)- एअरपोर्ट रोड- मरोळ नाका- साकी नाका- असल्फा- जागृती नगर- घाटकोपर.

प्रवासी भाडे---- 
वर्सोवा - डी. एन. नगर : 10 रु.-----
वर्सोवा - डब्ल्यूईएच : 20 रु.-----
वर्सोवा - मरोळ : 30 रु.-----
वर्सोवा - घाटकोपर : 40 रु.--- 

घाटकोपर - साकीनाका : 10 रु.-----
घाटकोपर - चकाला : 20 रु.-----
घाटकोपर - आझाद नगर : 30 रु.-----
घाटकोपर - वर्सोवा : 40 रु.----

मेट्रो प्रवासासाठी अशी आहे सुविधा---- -मुंबई मेट्रोच्या प्रवासाचा अनुभव घेताना प्रथम पहिल्या मजल्यावरील तिकीट खिडकीकडे जाऊन एकावेळच्या प्रवासाचे "टोकन‘ किंवा वारंवारच्या प्रवासाचे "स्मार्ट कार्ड‘ खरेदी करावे लागेल.
-हे "टोकन‘ किंवा "स्मार्ट कार्ड‘ "ऑटोमेटेड फेअर कलेक्‍शन सिस्टीम (एएफसी)‘वर ठेवल्यानंतर छोटेखानी दरवाजे उघडतील.
-या दरवाजाच्या पलीकडे गेल्यानंतर सुरक्षा रक्षक तुमची आणि तुमच्या साहित्याची सुरक्षा तपासणी करेल.
-त्यानंतर समोर असणाऱ्या "इंडिकेटर‘वर वर्सोवाकडे किंवा घाटकोपरकडे जाणारी मेट्रो ट्रेन दुसऱ्या मजल्यावरील कोणत्या फलाटावर असेल, याची खात्री करून आपल्या प्रवासासाठी संबंधित दिशेने जावे.
-दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी जिने आणि एस्केलेटरची सुविधा आहे. वयोवृद्धांसाठी "लिफ्ट‘ची सुविधा आहे.
-दुसऱ्या मजल्यावर पिवळ्या रेषेच्या अलीकडे उभे राहावे आणि संबंधित मेट्रो आल्यानंतर स्वयंचलित पद्धतीने दरवाजा उघडल्यानंतर त्यात शिरावे. मग तुमचा मेट्रो प्रवास सुरू होईल.
-इच्छित स्थानकात पोचल्यानंतर पहिल्या मजल्यावर उतरून आपल्याकडील "टोकन‘ किंवा "स्मार्ट कार्ड‘ हे "एएफसी मशीन‘वर ठेवताच छोटेखानी दरवाजा उघडेल. त्यातून बाहेर पडल्यानंतर तुम्ही स्थानकाबाहेर पडू शकाल.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages