तळकोकणातील राष्ट्रवादीचे आधारस्तंभ दीपक केसरकर पक्षावर नाराज असल्याची चर्चा काही दिवस सुरू होतीच. ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याचंही बोललं जात होतं. या पार्श्वभूमीवर, केसरकर यांनी आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली. आपली आणि समर्थकांची तक्रार त्यांनी तटकरेंपुढे मांडली. परंतु, त्यावर काहीच समाधानकारक तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे केसरकर यांनी राष्ट्रवादीला राम-राम ठोकला. आठ दिवसांत ते आपल्या आमदारकीचाही राजीनामा देणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांच्या 'दादागिरी'विरोधात दीपक केसरकर यांनी रणशिंग फुंकलं होतं. 'नीलेश राणेंना पाडा, कोकणातील दहशतवाद संपवा', असं जाहीर आवाहन करून त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवत असताना आणि नीलेश राणेंना राष्ट्रवादीनं पाठिंबा दिलेला असतानाही केसरकर यांनी त्यांच्याविरोधात दंड थोपटले होते. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनाही न जुमानता त्यांनी 'राणेशाही'चा निषेध केल्यानं राष्ट्रवादीनं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. या सगळ्या प्रकारामुळे केसरकर आणि त्यांचे समर्थक पक्षश्रेष्ठींवर नाराज झाले होते. आपलं बंड नारायण राणे यांच्याविरोधात नसून गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात आहे आणि त्याला पक्षानं पाठिंबा द्यावा, असं त्याचं म्हणणं होतं. परंतु, काँग्रेसविरोधात भूमिका घेणं राष्ट्रवादीला शक्य नसल्यानं सुनील तटकरे त्यांची मनधरणी करू शकले नाहीत.
सिंधुदुर्गात लोकशाहीची पुनर्स्थापना करण्यासाठी आपण राष्ट्रवादीतून बाहेर पडत असल्याचं केसरकर यांनी स्पष्ट केलं. शरद पवारांबद्दल आपल्या मनात आदर असल्याचंही ते म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी आपण चर्चा केली असून सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच आपण शिवसेनेत प्रवेश करू, असं केसरकर यांनी जाहीर केलं. त्यामुळे सेनेला कोकणात एक खंदा शिलेदार मिळाला असून राष्ट्रवादीला मोठाच धक्का बसला आहे.

