मुंबई / अजेयकुमार जाधव
लहान नवजात बालके चोरी होणे, रुग्ण रुग्णालयातून नाहीसा होणे असे प्रकार होत असताना मुंबई महानगर पालिकेच्या सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांकडून रुग्णालयात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची तपासणीच केली जात नसल्याने रुग्णालयाच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला झाला आहे.
मुंबई महानगर पालिकेचे सायन येथे लोकमान्य टिळक रुग्णालय आहे. या रुग्णालयामध्ये मुंबई उपनगरातील रुग्ण मोठ्या प्रमाणात आपल्यावर उपचार करण्यासाठी येत असतात. या रुग्णालयामध्ये रुग्णांची व रुग्णांना भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांची सतत ये जा असते. पालिकेने रुग्णांना भेटण्यासाठी सायंकाळी ४.३० ते ६.३० असा वेळ ठरवला असताना दिवसभर नातेवाईकांची ये जा सुरु असते. रुग्णालयात भेटीची वेळ ठरवून दिली असताना रुग्णालयात प्रवेश करताना सुरक्षा रक्षकांकडून कोणालाही अडवले जात नाही.
रुग्णांना भेटण्यासाठी नातेवाईकांना पास दिला जातो असा पास कोणाकडे आहे कि नाही याची साधी विचारपूस करण्याची तसदी सुरक्षा रक्षकांकडून घेतली जात नाही. रुग्णालयात कोण येते जाते या पेक्षा सुरक्षा रक्षक गप्पा मारण्यात आणि मोबाईल मध्ये व्यस्त असल्याचे चित्र दररोज सर्वाना पाहायला मिळत आहेत. सुरक्षा रक्षक पास का बघत नाहीत याची चौकशी केली असता पत्रकारांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.
याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर पालिकेचा सुरक्षा अधिकाऱ्याची सतत बदली होते परंतू सुरक्षा रक्षक नोकरीवर लागल्यापासून निवृत्त होई पर्यंत एकाच ठिकाणी नोकरी करतो. त्यांची कधीही इतर रुग्णालयात बदली होत नाही. त्यांनी चुका केल्या तरी त्यांना मेमो देवून कारवाही करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाही होत नाही. त्यांची इन्क्रिमेंट थांबवता येत नाही. या सर्व कारणांमुळे सुरक्षा रक्षक बिनधास्त झाले आहेत आपले कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही हे त्यांना माहित असल्याने कामामध्ये दुर्लक्ष होत आहे असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान याबाबत सायन रुग्णालयाचे डीन सुपे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते रजेवर असल्याचे तर इतर अधिकारी मिटिंग मध्ये असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी पालिका सभागृहाचे लक्ष वेधून पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना रुग्णालयाच्या सुरक्षेबाबत ठोस निर्णय घ्यायला लावू असे नगरसेवक अश्रफ आझमी यांनी सांगितले आहे.

