जागावाटपावरून महायुतीत धुसफूस सुरू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जागावाटपावरून महायुतीत धुसफूस सुरू

Share This
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर जागावाटपावरून महायुतीत आतापासूनच धुसफूस सुरू झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ६५, राष्ट्रीय समाज पक्षाने ३0 ते ३५, तर रिपाइंने २५ जागांची मागणी केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत महायुतीत जागावाटपाचा मुद्दा कळीचा बनणार, हे स्पष्ट झाले आहे.लोकसभा निवडणुकांत महाराष्ट्राने महायुतीच्या पारड्यात भरभरून माप टाकले. काँग्रेस-राष्ट्रवादीचा पुरता सफाया झाल्याने महायुतीच्या नेत्यांच्या आशा वाढल्या आहेत. शिवसेना आणि भाजपाच्या युतीत आता रामदास आठवलेंचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, विनायक मेटेंचा शिवसंग्राम या पक्षांचा समावेश असून युती आता महायुती म्हणून ओळखण्यात येते.विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपाचे १६९ आणि ११९ हा जागावाटपाचा फॉम्र्युला बदलून समसमान जागावाटप झाले पाहिजे, अशी मागणी भाजपाच्या अंतर्गत वर्तुळातून सुरू झाली आहे. शिवसेना आणि भाजपामधला जागावाटपाचा फॉम्र्युला अद्यापि ठरलेला नसतानाच महायुतीतील घटक पक्षांनीदेखील जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्यास आतापासूनच मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. 

रामदास आठवलेंच्या रिपाइंने २५, स्वाभिमानीच्या राजू शेट्टींनी ६५, तर रासपच्या महादेव जानकरांनी ३५ जागांवर आतापासूनच दावा केला आहे. जागावाटपाचा मुद्दा हा शिवसेना-भाजपासाठी कळीचा मुद्दा ठरणार आहे. आधी शिवसेना-भाजपात जागावाटप करायचे आणि मग या सहयोगी पक्षांना आपापल्या कोट्यातून जागा द्यायच्या की स्वतंत्रपणेच जागावाटप करायचे या मुद्दय़ावर अजून शिवसेना-भाजपात एकमत झालेले नाही. शिवसेना-भाजपात या मुद्दय़ावर उत्तर निघाल्यावरच इतर पक्षांच्या जागावाटपाचा मार्ग निश्‍चित होणार, असे आता तरी संकेत मिळत आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages