मुंबई- कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस या आघाडी सरकारने आतापर्यंत राज्यातील अनुसूचित जमातीच्या जनतेची फसवणूक केली असून, आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना जाहीरपणे विरोध करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्यात येईल, अशी माहिती मागासवर्गीय कृती समितीचे नेते अनंत तरे यांनी दिली. मुंबईत शिवालय येथे झालेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील सुमारे 35 अनुसूचित जमातींची एकत्रितपणे मागासवर्गीय कृती समिती स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये कोळी, धनगर, हलबा, ठाकूर आदी समाजाच्या संघटनांचा समावेश आहे. तरे म्हणाले, ""गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करूनही सरकारने या समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्र देताना सरकार दुजाभाव करत आहे. त्याचबरोबर जातीचे अनेक पुरावे सादर करूनही जातीचे दाखले देताना सरकार अन्याय करीत आहे.‘‘
केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजनांमध्ये आदिवासी विकास खात्याकडून येणारा निधी काही विशिष्ट जातींच्या विकासाच्या नावाखाली अन्यत्र वापरला जातो. त्याचबरोबर केंद्राने दिलेल्या अधिकारावर हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे, असे मागासवर्गीय कृती समितीचे नेते डॉ. विकास महात्मे यांनी सांगितले.

