मुंबई - मुंबईतील प्रवाशांचे हाल थांबवण्यासाठी उपनगरी रेल्वेविषयी श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी खासदारांनी केली आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात पहिल्याच टप्प्यात रेल्वेभाडे वाढवल्याने नाराज झालेल्या मुंबईतील प्रवाशांना दिलासा देणारे निर्णय घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. खासदार किरीट सोमय्या यांनी आवश्यक तिथे फलाटांची उंची वाढवण्यासाठी प्रशासन अर्थसंकल्पात भरीव तरतूद करील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. गोपाळ शेट्टी यांनी, फलाटांवरील स्वच्छतागृहात सुधारणा कराव्यात आणि पेयजलाचा दर्जा वाढवावा, अशी मागणी रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्याकडे केली आहे.
मुंबईत सुमारे 75 लाख नागरिक दररोज रेल्वेने प्रवास करतात. त्यांना "अच्छे दिन आये हैं‘ म्हणत दिलासा द्या, अशी मागणी खासदारांनी केली आहे. ज्येष्ठ भाजप नेते राम नाईक यांनी मुंबईतील उपनगरी सेवांचा दर्जा दर्शवण्यासाठी श्वेतपत्रिका जारी करावी, अशी मागणी केली आहे. ते म्हणाले, की मुंबईतील लोकल सेवा तोट्यात आहे, असा दावा प्रशासन करीत असले, तरी प्रत्यक्षात स्थिती तशी नाही. माझ्या मते ही सेवा फायद्यात आहे. 1990 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार ही सेवा फायद्यात होती. चेन्नई, कोलकाता आणि मुंबई या महानगरांत उपनगरी सेवा आहे. मुंबई वगळता अन्य दोन शहरांत ती तोट्यात असल्याने किफायतीशीर नाही, असे सांगितले जाते. मुंबईत 1990 मध्ये रेल्वे फायद्यात होती. वाढलेले प्रवासी आणि तेवढेच डबे या स्थितीत ही सेवा नक्कीच फायद्यात आहे. माझ्या मते आमच्या सरकारने श्वेतपत्रिका प्रकाशित केली, तर खरी परिस्थिती समोर येईल.
फलाटांची उची वाढवावी; तसेच सरकत्या जिन्याची सोयही लवकरात लवकर सर्वत्र करावी, अशी मागणीही खासदारांनी केली आहे. राम नाईक म्हणाले, की दोन वर्षांपूर्वी 54 स्थानकांवर सरकते जिने बसवण्यात येतील, अशी घोषणा झाली होती. पण काहीच घडले नाही.
