साहेबांचा छळ उद्धवनेच केला - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

साहेबांचा छळ उद्धवनेच केला

Share This

'बाळासाहेब ठाकरे यांचा सर्वात जास्त छळ उद्धव यांनीच केला आहे. मातोश्री'च्या भिंतींना विचारले, तरी तुम्हाला हेच उत्तर मिळेल,' अशा शब्दांत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. नारायण राणे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केल्यानंतर त्यांच्या पुढील वाटचालीबद्दल चर्चा सुरू झाली आहे. ते शिवसेनेत जाणार की भाजपात, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. मात्र, बाळासाहेबांना त्रास देणाऱ्यांना शिवसेनेचे दरवाजे बंद आहेत आणि भाजपही त्यांना घेणार नाही,' असे सांगत उद्धव यांनी अप्रत्यक्षपणे राणेंवर टीका केली होती. या टीकेला राणे यांनी शुक्रवारी सणसणीत प्रत्युत्तर देत उद्धव यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.

'बाळासाहेबांचा छळ कोणी केला याची सविस्तर माहिती हवी असेल तर 'मातोश्री'वर काम करणाऱ्या नोकरांना विचारा, तिथे बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांना विचारा, शिवसेनेतील जुन्या नेत्यांना विचारा, ते उद्धवचेच नाव घेतील,' असे राणे म्हणाले. उद्धव हे बाळासाहेबांचे नाव घेण्यासही लायक नाहीत. बाळासाहेबांना सोडून ते दोनवेळा वेगळे राहिले. 'मातोश्री'च्या आतील गोष्टी मी कधी बोललो नाही. पण उद्धवने पुन्हा तोंड उघडल्यास पुरते वस्त्रहरण करून टाकेन,' असा इशाराही राणेंनी दिला.

हे काय कोकण भयमुक्त करणार?

कोकण भयमुक्त करण्याच्या उद्धव यांच्या वक्तव्याचीही राणेंनी खिल्ली उडवली. 'दर दोन महिन्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण मर्द असल्याचे उद्धव सांगतात. जो मर्द असतो त्याला सांगावं लागत नाही. स्वत:बाबत संशय असणारा माणूस कोकण भयमुक्त कसं करणार,' असा बोचरा सवाल राणेंनी केला.

स्वत:च्या पक्षांतराबाबत राणे म्हणाले, 'जो मर्द आहे आणि ज्याच्यात काम करण्याची धमक आहे, अशा नेत्यासाठी कुठे व्हेकन्सी असते. उद्धव यांनी ते मला शिकवण्याची गज नाही. मी कोणत्या पक्षात जाणार, याची उठाठेवही त्यांनी करू नये,' असेही त्यांनी सुनावले. मी कोकणचा लोकप्रतिनिधी असून शेवटच्या क्षणापर्यंत येथील जनतेची सेवा करत राहीन.'

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages