‘बचावदोर’ही जिकिरीचा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 July 2014

‘बचावदोर’ही जिकिरीचा



पावसामुळे दृश्यमानता कमी झाली असतानाच नागरी वस्तीत हेलिकॉप्टर कमी उंचीवर उतरवायचे... त्यातच आगीच्या ज्वाळा आणि धूर होताच... इमारतीवर हेलिपॅड असले, तरी तेथे लँडिंग केवळ अशक्य... एक मजला खाली हेलिकॉप्टरमधून बचावदोर सोडायचा, तर तो कुठेही न अडकता पोहोचायला हवा आणि वाचवलेल्या व्यक्तीला लवकरात लवकर कुठेतरी उतरवून परत इथेच यायला हवे... अशी अनेक आव्हाने तटरक्षक दलाच्या चेतक हेलिकॉप्टरचे वैमानिक कमांडर कौस्तुभ गोसावी यांना सांभाळायची होती.
चारच दिवसांपूर्वी रेवदंड्याजवळ एमव्ही प्रियंका या जहाजावरील ११ कर्मचाऱ्यांना वाचविणारे कमांडर कौस्तुभ गोसावी यांच्यासमोर शुक्रवारी अंधेरीच्या आगीचे आव्हान होते. अग्निशामन दलाकडून तटरक्षक दलाच्या मुख्यालयात हेलिकॉप्टरच्या मदतीची वर्दी दुपारी दीड वाजता वर्दी मिळाली आणि आग अंधेरीत असल्याने मुंबई व जुहू या दोन्ही नागरी हवाई वाहतूक हाताळणाऱ्या विमानतळांची परवानगी मिळाल्यानंतर दोन वाजता कुलाब्याच्या आयएनएस शिख्रा तळावरून हेलिकॉप्टरने टेकऑफ घेतले.

आगीच्या ठिकाणाची रेकी करून नेमक्या आव्हानांचा अंदाज गोसावी यांनी घेतला. वाचवलेल्या कुणालाही जुहू विमानतळावर उतरवून परत येण्यास वेळ लागला असता. त्यामुळे त्यांनी याच परिसरातील एक मैदान लँडिंगसाठी निश्चित केले. इमारतीपाशी हेलिकॉप्टर उतरविण्याचा दोन वेळा सराव केला. त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये सहवैमानिक असिस्टन्ट कमांडंन्ट निखिल हेब्बाळे व प्रदीपकुमार आणि जितेंद्र सिंग हे दोन डायव्हर होते.

सर्वसाधारणपणे बचावाच्या दोरावरून पहिल्या फेरीत तरी एखादा डायव्हर मार्गदर्शनासाठी खाली उतरतो. परंतु येथील परिस्थितीचा अंदाज नसल्याने व आग भडकत असल्याने कुणाला खाली उतरविणे धोक्याचे ठरले असते. हेलिकॉप्टरच्या पंख्यांच्या वाऱ्याने विझलेली आग पुन्हा पसरू नये, याचीही काळजी त्यांना घ्यायची होती. म्हणूनच आधी एकाच व्यक्तीस वर उचलून त्याच्याकडून आगीच्या ठिकाणच्या खाचाखोचा माहिती करून घ्यायच्या, असा निर्णय कमांडर गोसावी यांनी घेतला. त्यानुसार शेजारच्या मैदानावर माणिक ओगळे यांना उतरविल्यावर पुढच्या ट्रीपमध्ये तीन जणांना आणण्याची तयारी कमांडर गोसावींनी केली होती. याकामी नौदलाचे सीकिंग हे हेलिकॉप्टरही तयार होतेच व त्यातून अधिक माणसे एकावेळी आणता आली असती. अर्थात तोपर्यंत अग्निशमन दलाने आग व परिस्थिती आटोक्यात आल्याचा संदेश दिल्याने आग शमल्याची चहूबाजूंनी खातरजमा करून हे चेतक हेलिकॉप्टर कुलाब्यात परतले. किनारी भागात तैनात असल्याने मान्सूनच्या काळात तर अशा कोणत्याही आपत्तीनिवारणासाठी आमचे हेलिकॉप्टर सुसज्जच असते, असे कमांडर गोसावी यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS