महिलांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी आज सोमवारी मंत्रालयाच्या महिला बालविकास दालनात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला बालकल्याणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी उपस्थित तक्रारदार महिलांबरोबर चर्चा केली. यावेळी प्रधान सचिव उज्ज्वल वुके, गुप्तवार्ता विभागाच्या रश्मी शुक्ला, महिला आयोग सदस्या सचिव शेमिता बिश्वास व या विभागातील सर्व अधिकारी उपस्थित होते.
राज्याच्या विविध भागातून आलेल्या महिलांनी यावेळी आपल्या तक्रारी महिला बालकल्याण मंत्र्यांसमोर मांडल्या. या तक्रारी प्रा. गायकवाड यांनी समजून घेऊन त्यांच्या तक्रारींचे निवारण केले. प्रत्येक महिलेला आपली तक्रार मांडण्याची संधी देऊन यावर तातडीने उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही दिली. विशेषतः ग्रामीण भागात महिलांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होतो. प्रसंगी पोलिसांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. त्यामुळे अशा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असू, अशी ग्वाही प्रा. गायकवाड यांनी दिली. नोकर भरतीतही महिला राखीव जागांवर अचानक पुरूष वर्गाची वर्णी लावली जाते. अशाप्रकारची तक्रार यावेळी उपस्थित एका महिलेने केली. यावर गायकवाड यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. काही तक्रारी न्यायप्रविष्ठ असल्याने त्यावर यावेळी फक्त चर्चा करण्यात आली. यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनीस या पदांच्या भरतीबाबत लवकर निर्णय घेण्याबाबत अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.

