रेल्वे अपघातांमधील 630 मृत अनोळखीच - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रेल्वे अपघातांमधील 630 मृत अनोळखीच

Share This
मुंबई - मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल प्रवाशांच्या मृत्यूचा सापळा बनत आहे. मध्य, हार्बर आणि पश्‍चिम या तीन मार्गांवर सात महिन्यांतील अपघातांमध्ये एकूण 1 हजार 963 प्रवासी मृत्युमुखी पडले. या अपघातात दगावलेल्या 630 प्रवाशांची ओळख अद्याप पटली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 


उपनगरी रेल्वेगाड्यांतून दररोज तब्बल 50 लाख नागरिक प्रवास करतात. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत तर प्रवासी जीव मुठीत धरून "लोकलदिव्य‘ करतात. मुंबईसाठी उपनगरी गाड्या वाढवण्याची मागणी दर वर्षी अर्थसंकल्पाच्या वेळी केंद्र सरकारकडे केली जाते; मात्र परिस्थिती "जैसे थे‘च आहे. याचा फटका प्रवाशांना बसतो. सरकारी अनास्थेची किंमत बऱ्याचदा जिवानेच चुकवावी लागते. मध्य, हार्बर आणि पश्‍चिम रेल्वेमार्गांवर मागील सात महिन्यांत झालेल्या अपघातांत तब्बल 1 हजार 963 प्रवासी मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये 1 हजार 732 पुरुष आणि 231 महिला आहेत. यातही धक्कादायक बाब म्हणजे 630 मृतांची ओळख पटलेली नाही.
रेल्वे पोलिस मृत प्रवाशांच्या नातेवाइकांचा शोध घेतात; पण त्यांचा ठावठिकाणा न समजल्यास न्यायालयाची परवानगी घेऊन मृत प्रवाशांवर अंत्यसंस्कार केले जातात, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले. त्यासाठी रेल्वे पोलिसांनी सुरू केलेल्या "शोध‘ या वेबसाईटवर मृत प्रवाशांची माहिती प्रसिद्ध केली जाते.
मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर, कुर्ला, ठाणे, डोंबिवली, कल्याण, कर्जत या स्थानकांच्या परिसरात प्रवाशांच्या अपघाती मृत्यूंचे प्रमाण मोठे आहे. कुर्ला आणि ठाणे स्थानकांदरम्यान रेल्वेमार्ग ओलांडताना, लोकलमधून पडून, पेंटोग्राफला चिकटून जीव गमावणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. लोकलमध्ये "स्टंट‘ करणारेही मृतांच्या संख्येत भर घालतात. कुर्ला स्थानकाच्या परिसरात तब्बल 248 जणांना अपघातांत जीव गमावावा लागला, तर चर्चगेटजवळ 21 प्रवासी मृत्युमुखी पडले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सात महिन्यांतील बळी विभाग मृत्यू
मध्य रेल्वे 1,018
हार्बर रेल्वे 266
पश्‍चिम रेल्वे 679
एकूण 1,963 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages