तिरुअनंतपुरम - केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सत्ता आल्यानंतर देशात जातीय दंगलीच्या प्रमाणात वाढ झाल्याचा आरोप, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर मागील आठवड्यात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही टीका केली होती. ते म्हणाले, की संसदेत फक्त एकाच व्यक्तीचा आवाज ऐकला जातो. आता सोनिया गांधी यांनीही मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. केरळमधील एका कार्यक्रमात सोनिया गांधींनी हे वक्तव्य केले.
सोनिया गांधी म्हणाल्या, ‘‘भाजप सरकारचे दंगली घडवून देशात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. देशात नवे सरकार स्थापन होवून अकरा आठवड्यांचा कालावधी झाला असून, या काळात महाराष्ट्र, उत्तरप्रदेश अशा विविध राज्यांमध्ये दंगली झाल्या आहेत‘. जातीय दंगलीचे वाढते प्रमाण ही चिंताजनक बाब असून यूपीए सरकारच्या कार्यकाळात दंगलीचे प्रमाण कमी होते.‘‘
