मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईच्या सर्व शाळांमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविणे बंधनकारक करणारी मुंबईतील शिक्षण विभागांची कार्यालये एवढेच नव्हे तर खुद्द बालभवन आगीच्या ज्वालांवर आहे. शिक्षण विभागाच्या कुठल्याही कार्यालयात अग्निप्रतीबंधात्मक यंत्रणाच नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. अग्नि प्रतीबंधात्मक यंत्रणेचा अभाव असल्यामुळे या कार्यालांमध्ये येणाऱ्या लोकांचा तसेच तेथे काम करणाऱ्या कर्मचार्यांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या सर्व कार्यालयात ही यंत्रणा बसविण्यात यावी अशी मागणी मनसेचे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर, सचिन मोरे, उजाला यादव, अमोल रोग्ये यांनी शालेय शिक्षण सहसचिव प्रकाश ठुबे यांच्या केली आहे.
आगीसारख्या आपत्तीशी लढण्यासाठी राज्य सरकारने अग्निसुरक्षा कायदा अंमलात आणला.या कायद्याच्या कलम ३ नुसार इमारतीचा मालक अथवा वापर करणार्याला आपली वास्तू आगीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.त्यामुळे प्रत्येक संस्थेला फायर सेफ्टी ऑडिट सक्तीचे करण्यात आले आहे.शाळांच्या तपासणीपासून ते शिक्षक -पालकांच्या तक्रारी, समस्या यांची दखल घेवून त्या सोडविण्यासाठी मुंबईत विभागीय स्तरावर नेमण्यात आलेल्या शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग, शिक्षण निरीक्षक उत्तर मुंबई, दक्षिण मुंबई, पश्चिम मुंबई विभाग तसेच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालय, जवाहर बालभवन अशी कार्यालये आहेत. परंतु या शिक्षण विभागांच्या कार्यालयांमध्ये अग्निशमन यंत्रणाच नसल्याचे मनविसेचे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर यांनी सांगितले.
