धर्मावरून परस्परांत तेढ नको - राष्ट्रपतींनी टोचले सरकारचे कान - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

धर्मावरून परस्परांत तेढ नको - राष्ट्रपतींनी टोचले सरकारचे कान

Share This
नवी दिल्ली - धर्मांतराच्या मुद्द्यावरून संसदेपासून रस्त्यांपर्यंत माजलेले रणकंदन, नथुराम गोडसेचे उदात्तीकरण आणि हिंदूंच्या अपत्यांवरून सुरू असलेल्या शाब्दिक चढाओढीच्या पार्श्वभूमीवर परस्परांमध्ये तेढ निर्माण होण्यास धर्म कारणीभूत ठरू नये, असे सुनावत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, रविवारी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात अप्रत्यक्षपणे सरकारचे कान टोचले. देशातील सध्या सुरू असलेल्या अर्थशून्य उन्मादाच्या स्पर्धेबाबत त्यांनी तीव्र नापसंती नोंदवली.

राज्यघटना हा लोकशाहीचा पवित्र ग्रंथ आहे. भारतीयांनी नेहमीच बहुसंख्यवादाचा पुरस्कार केला आहे. सहिष्णूतेचे तत्त्व मान्य केले आहे. त्यामुळेच विभिन्न धर्मीयांमध्ये सलोखा राखण्यालाच पसंती दिली आहे, याची आठवण मुखर्जी यांनी करून देत मूल्यांची अधिक दक्षतेने जपणूक व्हायला हवी, अशी समज त्यांनी दिली. बेताल वक्तव्यांनी लोकांच्या मनांना जखमा होतात, ही बाब लक्षात घ्यायला हवी. धर्म हा लोकांना एकत्र आणण्याचे साधन आहे, अशी महात्मा गांधींची शिकवण आहे. त्यामुळे ते तेढीचे कारण ठरू नये, असे त्यांनी सुनावले.

भारताच्या प्रगतीचा मार्ग रोखण्यासाठीच पाककडून कुरापती सुरू असल्याचे 'दहशतवादा'संदर्भात बोलताना मुखर्जी म्हणाले. देशादेशातील संघर्ष हा दहशतवादाचे रूप धारण करत आहे. त्यामुळेच शांतता, अहिंसा, मैत्री हेच आपल्या परराष्ट्र धोरणाचे आधार असायला हवेत, असे ते म्हणाले.

बलात्कार, खून, अपहरण, हुंडाबळी​ यामुळे महिला भयग्रस्त आहेत. स्वतःच्याच घरात त्यांना सुरक्षित वाटत नाही. त्यामुळेच महिलांच्या सन्मान राखण्याची प्रत्येक देशवासीची जबाबदारी आहे, असे ते म्हणाले. महिलांचा आदर करणारे राज्यच जागतिक शक्ती बनू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. महिलांप्रती आदर राखण्याचाच विसर पडत असेल, तर पालक, शिक्षण आणि नेते म्हणून आपण अपयशीच ठरलो, असे म्हणाले लागेल.

विश्वासाला धक्कासरकारकडून वारंवार वापरल्या जाणाऱ्या अध्यादेशमार्गाबाबतही त्यांनी नाराजी नोंदवली. कोणत्याही चर्चेशिवाय कायद्याची अंमलबजावणी करणे, हा लोकांच्या विश्वासाला धक्का आहे, असे मत त्यांनी मांडले. लोकांनी नेतृत्व निवडून देण्याचे त्यांचे काम चोख केले आहे. त्यामुळेच आता त्यांच्या विश्वासाचा सन्मान राखणे, ही जबाबदारी आहे. स्वच्छ, पारदर्शी, जबाबदार आणि समाजाभिमुख कारभारासाठी मत दिले आहे, याचे भान ठेवायलाच हवे, असे ते म्हणाले.

president

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages