मुंबईबाहेरही 7 लाख घरे बांधण्याचा संकल्प
मुंबई - चार वर्षांत मुंबईत 11 लाख आणि मुंबईबाहेर 7 लाख परवडणारी घरे टप्प्याटप्प्याने बांधण्यात येणार आहेत. याविषयीचा कृती आराखडा मे मध्ये जाहीर केला जाणार आहे. वर्षाला केवळ हजार घरे बांधणारे म्हाडा यासाठी सक्षम नाही. त्यामुळे राज्य सरकार विविध पर्याय चाचपून पाहत आहे, असे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी गुरुवारी सांगितले. म्हाडा पत्रकार संघाच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्य सरकार नवे गृहनिर्माण धोरण आखत असल्याचे निमित्त साधत म्हाडा पत्रकार संघाने मंत्री प्रकाश मेहता यांना वर्धापनदिनी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. त्या कार्य्रकमात सरकारच्या धोरणाविषयीचा आराखडा त्यांनी मांडला. "2022 पर्यंत सर्वांसाठी घर‘ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांपासून आम्ही चिंतन करीत आहोत. गृहबांधणीसाठी कालबद्ध, स्पष्ट व कृतिशील आराखडा 1 मे रोजी जाहीर करू. सरकार चार वर्षांत मुंबईत 11 लाख घरे मुंबईत बांधणार आहे. मुंबई महानगर प्रदेशात त्या तुलनेत घरांचा प्रश्न किचकट नाही. त्यामुळे तिथे सहा ते सात लाख घरे बांधली जातील. मिठागरे व बीपीटीच्या जमिनींवर बांधकामे केली जातील, असे मेहता यांनी जाहीर केले.
