मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगर पालिकेने मुंबई शहराचा १९९१ साली सादर झालेल्या दुसऱ्या विकास आराखड्यात पालिकेच्या १०४ पुनर्विकास प्रकल्पात भांडवली मुल्यांचा करोडोंचा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्याबाबत जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) व दैनिक जनतेचा महानायक ( २३ फेब्रुवारी २०१५ ) मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखाची दाखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली असून नगर विकास विभाग १ चे सचिव नितीन करीर यांच्याकडे चौकशी करण्यासाठी सदर लेख पाठवण्यात आला आहे.
जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) चे संपादक अजेयकुमार जाधव यांचा २२फेब्रुवारी २०१५ रोजी " मुंबईचा आराखडा आणि भांडवली मूल्याचा घोटाळा " हा लेख प्रसिद्ध झाला होता. या लेखामध्ये माहिती अधिकारातून मिळालेल्या माहिती मधून १९९१ च्या विकास आराखड्यातील १०४ प्रकल्पातील ४१ प्रकल्पात ६२८ कोटी ३ लाख २४ हजार ९२७ रुपये भांडवली मुल्य विकासकांनी थकवले असून पालिकेच्या १८ टक्के व्याजाचे एका वर्षाचे ११३ कोटी ४ लाख ५८ हजार ४८६ रुपये होतात. गेल्या १० ते २० वर्षे हि रक्कम पालिकेने वसूल केलेली नाही. पालिका अधिकारी आणि विकासकांनी मिळून हा घोटाळा केला असल्याचे म्हटले आहे.
हे प्रकरण गंभीर असल्याने २०१४ ते २०३४ च्या नव्या विकास आराखड्यात पुन्हा असे प्रकार होऊ शकतात. हि रक्कम विकासकांकडून वसूल व्हायला हवी असे मत मांडण्यात आले होते. याची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली असून नगर विकास विभागाला चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते दिलीप गायकवाड यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना निवेदन दिले असून भांडवली मूल्याच्या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
