मुंबई / प्रतिनिधी - महाराष्ट्र सरकारने इस्माईल युसुफ कॉलेजची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने अल्पसंख्यांक समाजाच्या शिक्षणावर गदा आणणारी भूमिका बदलली नाही तर सरकार विरोधात मुस्लिम आणि सेक्युलर संघटना मुंबई मध्ये जनआंदोलन उभे करतील असा इशारा सुधींद्र कुलकर्णी आणि आमदार कपिल पाटील यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
इस्माईल युसुफ यांनी १९१४ मध्ये मुस्लिम समाजाच्या उच्च शिक्षणासाठी ८ लाख रुपये देणगी देवून १९३० साली निवासी कॉलेजआणि क्याम्पस उभा केला आहे. सुरवातीला १२० एकर भूखंडावर कॉलेज क्याम्पास होता आता हा क्याम्पस ५४ एकरचा उरला आहे. बाकी जागेवर अनधिकृत बांधकाम झाले आहे त्यातच आता नव्या शिवसेना भाजपाच्या सरकारने १५ एकर जागेवर न्याशानल लॉ युनिव्हर्सिटी उभारण्याची घोषणा केली आहे. या ठिकाणी शैक्षणिक हब करून मराठी भाषा भवनाची इमारत उभी करण्याची शासनाची योजना आहे. शासनाने आपल्या योजनांसाठी वेगळी जागा देण्याचे सोडून इस्माईल युसुफ कॉलेजची जागा हडपण्याचा डाव चालवला आहे असा आरोप कुलकर्णी यांनी केला.
भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात वक्फ बोर्डाच्या जागेवरील अतिक्रमण हटवले जाईल, अल्पसंख्यांक शिक्षण व इतर संस्था मजबूत केल्या जातील असे म्हटले असले तरी महाराष्ट्रातील सरकार या जाहिरनाम्या विरोधात काम करत आहे, सब का साथ सब का विकास म्हणणारे सरकार मुस्लिमांच्या विकासाच्या आड येत असल्याचा असा आरोप कुलकर्णी यांनी केला. इस्माईल युसुफ कॉलेज वाचवण्यासाठी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीच्या माध्यमाने महाराष्ट्र सरकारने इस्माईल युसुफ कॉलेजच्या जमिनीवरचे अतिक्रमण थांबवावे, जमिनीवरील अतिक्रमण काढून टाकावे, इस्माईल युसुफ कॉलेज क्याम्पस अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था म्हणून घोषित करावे, इस्माईल युसुफ कॉलेज आणि क्याम्पस अंजुमन - ई - इस्लाम या ट्रस्टकडे सोपवावे, इस्माईल युसुफ कॉलेजच्या जागेवर जागतिक दर्जाचे विद्यापीठ सुरु करावे अश्या मागण्या कपिल पाटील यांनी संघर्ष समितीच्या वतीने केल्या.
