पुरोगामी- सामाजिक चळवळीतील नेत्यांना संरक्षण देण्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पुरोगामी- सामाजिक चळवळीतील नेत्यांना संरक्षण देण्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची मागणी

Share This
मुंबई - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पुरोगामी व  सामाजिक चळवळीतील नेत्यांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की, कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येने महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला काळीमा फासली गेली आहे. ही घटना महाराष्ट्रात प्रतिगामी व सनातन विचारधारा डोके वर काढत असल्याचे निदर्शक आहे. या पार्श्वभूमीवर पुरोगामी व सामाजिक चळवळीतील तसेच पीडित-शोषितांसाठी आवाज उठविणा-या सर्वच नेत्यांना पुरेसे संरक्षण देण्याची आवश्यक्ता निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने अशा नेत्यांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन त्यांना पुरेसे संरक्षण देण्यासंदर्भात पावले उचलावीत.

विचारांशी लढाई विचारानेच झाली पाहिेजे, अशी भूमिका घेऊन स्वस्थ बसणे आता संयुक्तिक नाही. धर्म व संस्कृतीरक्षणाच्या नावाखाली सर्वत्र झुंडशाही व गुंडगिरी सुरू झाली आहे. संपूर्ण देशात वैचारिक दहशतवाद थैमान घालतो आहे. नथुराम गोडसेच्या दहशतवादी कृत्याचा उदो-उदो करून गांधी विचारांवर घाला घालण्याचे काम सुरू आहे. अशा सर्वच प्रवृत्तींना वेळीच रोखले गेले नाही तर भविष्यात देशाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी भीती आ.श्री माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

गोविंदराव पानसरे यांचे मारेकरी व कटाचे सूत्रधार शोधून काढण्यासाठी राज्य शासनाने युद्धपातळीवर मोहिम राबवावी आणि त्यांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. गरज असल्यास या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा. त्याचप्रमाणे भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळायची असेल तर सनातन व प्रतिगामी विचारधारेचे समर्थन करणा-या सर्वच संघटनांवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई सुरू करावी, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages