मुंबई / अजेयकुमार जाधव
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जाज्वल्य दैदिप्यमान विचारांची सतत प्रेरणा मिळत रहावी यासाठी दादर चैत्यभूमी परिसरात अशोक स्तंभाजवळ "क्रांतिसूर्य भीमज्योत" उभारावी. या भीमज्योतीचा खर्च मुंबई महानगर पालिकेने महानगर ग्यास कंपनीच्या सहाय्याने करावा असा प्रस्ताव नायगाव दादर येथील प्रभाग क्रमांक १९६ च्या नगरसेविका पल्लवी महेंद्र मुणगेकर यांनी पालिका आयुक्त सिताराम कुंटे यांच्याकडे सादर केला आहे.
पालिका आयुक्त सिताराम कुंटे यांना पाठवलेल्या पत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सुधारणेचे प्रखर क्रांतिकारक, विषमतारहित सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, भातीय संविधानकार, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ आणि राजकीय विश्लेषक, कायदेतज्ञ, शिक्षणतज्ञ, साहित्तिक, विद्याविभूषित अशी अनेक बिरुदावली भूषवणारे भारतातले एकमेव व्यक्ती आहेत. त्यांनी भारतातील अन्याय आणि जुळूमांच्या शृंखलेने जखडलेल्या असंख्य पददलितांना अस्मिता व स्वाभिमान बहाल करणारे शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा असा मूलमंत्र दिला. त्यांनी रक्ताचा एकही थेंब न सांडता क्रांती होऊ शकते याची प्रचीती बौद्ध धम्म स्वीकारून दिली आहे.
जगाच्या पाठीवर एकही असा नेता नाही ज्याच्यासाठी लाखो लोक एकत्र येतात. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी ६ डिसेंबरला देश परदेशातून लाखो लोक दादर चैत्यभूमी येथे येतात. मला स्वतालाही बाबासाहेबांच्या क्रांती व विचाराने प्रभावित होऊन सामाजिक काम करण्याची व नगरसेविका बनण्याची संधी मिळाली असल्याने. बाबासाहेबांच्या विचारांची सतत प्रेरणा इतरानाही मिळत राहावी म्हणून मुंबई मधील हुतात्मा चौकातील हुतात्मा ज्योती प्रमाणे क्रांतीसूर्य भिमज्योत उभारण्यात यावी अशी मागणी पल्लवी मुणगेकर यांनी केली आहे.
