ऑगस्टपर्यंत मतदार ओळखपत्र 'आधार'सोबत संलग्न होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ऑगस्टपर्यंत मतदार ओळखपत्र 'आधार'सोबत संलग्न होणार

Share This
ईशान्य भारत वगळता उर्वरित देशातील मतदार ओळखपत्र आधार क्रमांकासोबत संलग्न करण्याची प्रक्रिया येत्या ऑगस्ट महिन्यात पूर्ण होईल, असा विश्‍वास निवडणूक आयोगाने मंगळवारी व्यक्त केला. ईशान्य भारतातील काही भागात ही प्रक्रिया पूर्ण होण्यास ऑगस्टनंतरही काही दिवस लागणार असले तरी वर्षाच्या अखेरीसपर्यंत तेथीलही मतदार ओळखपत्र आधारसोबत संलग्न करण्यात येणार आहे.

दक्षिणेतील आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, आणि गोवा या राज्यांमध्ये येत्या मे महिन्यात आधार क्रमांक मतदार ओळखपत्रासोबत जोडण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारे आधार क्रमांकासोबत मतदार ओळखपत्र जोडण्याची प्रक्रिया पार पडणार असून, जगातही असे प्रथमच घडत आहे. त्यामुळे मतदार याद्यांमधून बोगस मतदारांची गच्छंती होणार आहे. जवळपास ८५ कोटी मतदारांना या प्रक्रियेमुळे फायदा होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त एच.एस. ब्रह्म यांनी सांगितले की, या प्रक्रियेमुळे मतदार याद्यांमधील ५ ते ६ टक्के बनावट नावांची कपात होणार आहे. मतदार याद्यांतील गोंधळामुळे निवडणूक आयोगाला वारंवार टीकेचे लक्ष्य व्हावे लागते. हा प्रकार टाळण्यासाठी आसाम निवडणुकांच्या वर्षभर अगोदरच मतदार ओळखपत्र आधार क्रमांकासोबत संलग्न करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केल्याचे ब्रह्म यांनी सांगितले. आसाममध्ये मे २0१६ पूर्वी विधानसभेची निवडणूक होणार आहे. आसाममधील ९५ टक्के म्हणजेच जवळपास १ कोटी ९ लाख मतदारांना ओळखपत्रांचे वितरण झाले असून, जुलैपर्यंत सर्व मतदारांना ओळखपत्र वितरित करण्यात येणार आहेत. या प्रक्रियेत कोणत्याही बनावट मतदारांचा यादीत समावेश नसल्याची खात्री करण्यात येणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages