वीटभट्टी आणि दगड खाणीवर काम करणाऱ्या स्थलांतरीत कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित राहत असल्याने त्यांच्या शिक्षणासाठी विशेष तरतूद करण्याची गरज असल्याचा मुद्दा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून उपस्थित करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारने या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली.
याबाबत बोलताना ते म्हणाले की, राज्याने २००२ साली प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. मात्र तरीही आज वीटभट्टीवर काम करणाऱ्या मुलांना तो हक्क मिळत नाही. तो हक्क मागण्यासाठी ठाणे जिल्ह्यातल्या वीटभट्टी कामगारांच्या मुलांचा मोर्चा आझाद मैदानावर येत आहे. आमच्या पाठीवर दप्तर कधी येणार, असा प्रश्न ही मुले या मोर्चाच्या माध्यमातून विचारत आहेत. त्यामुळे सरकारने या प्रश्नी लक्ष घालण्याची विनंती त्यांनी केली.
त्यावर उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या सुचनेचा प्राधान्यांने विचार केला जाईल अशी हमी दिली. विरोधी पक्षनेत्यांनी मांडलेला हा मुद्दा महत्वाचा असून शाळाबाह्य मुलांचा हा विषय हाती घेऊन येत्या काळात त्यावरील विशेष योजनेची आम्ही अंमलबजावणी करणार आहाेत,अशी माहितीही त्यांनी दिली.
