मुंबई, मंगळवार (प्रतिनिधी) - घोडपदेव येथील हिरजी भोजराज चाळीला लागलेल्या आगीत १५ ते २० झोपड्या जळून खाक झाल्या. ही आग विझविताना अग्निशमन दलाचे ४ जवान गंभीर जखमी झाले. यात एका अधिकाऱ्याचा व तीन जवानांचा समावेश आहे. या चौघांनाही पालिकेच्या केईएम रुग्णालयात उपचार्थ दाखल केले. तर मस्चिद बंदर येथील एका इमारतीला सायंकाळच्यावेळेस आग लागली. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आग विझविल्याने अनर्थ टळला.
कॉटन ग्रीन येथील रामभाऊ भोगले मार्गावरील घोडपदेव येथे हिरजी भोजराज चाळ आहे. या चाळीला सायंकाळी ४ च्या सुमारास आग लागली. क्षणार्धात या आगीने उर्ग्र रुप धारण केल्याने घरातील सिलेंडरचा स्पोट झाला. परिणामी आगडोंब उसळल्याने रहिवाशांची तारांबळ उडाली. घरातील हाती लागेल ते साहित्य घेऊन घराबाहेर पडले. या आगीची माहीती मिळताच अग्निशमन दलाचे जवान ८ फायर इंजिन, ७ जेटी तसेच २ रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आगीमुळे पसरलेला धुर आणि ज्वालामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यास अडचणी आल्या. अखेर ६ वाजून ५२ मिनिटानी आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलाला यश आले. तोपर्यंत १५ ते २० झेपड्या आगीत जळून खाक झाल्या होत्या. यामध्ये एक अधिकारी आणि तीन जवान जखमी झाले.
मस्जिद बंदर येथे सायंकाळी ६च्या सुमारास दुसरी आग लागली. संत तुकाराम मार्गावरील गोकूळ इमारतीमधील पहिल्या मजल्यावर आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवानांनी तात्काळ आग विझविली. मात्र, सुदैवाने या आगीत कोणतीही मनुष्य हाणी झाली नाही.
