मुंबई (प्रतिनिधी) - मुंबईतील खासगी रुग्णालयात स्वाईन फ्लूबाधित रुग्णांना दाखल करून घेत नसल्याने पालिकेच्या रुग्णालयात स्वाईन फ्लू बाधित रुग्णांची वाढ होत असल्याचा आरोप पालिका आरोग्य समितीच्या अध्यक्षा गिता गवळी यांनी केला आहे. तसेच या संबंधित काही तक्रारीही आपल्याकडे असून याची दखल घेण्यासाठी आपण आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना पत्र पाठविले असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईत स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत आहे. मात्र, खासगी रुग्णालये स्वाईन फ्लू जडलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार देत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस पालिका रुग्णालयात स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत आहे. मात्र मुंबईतील सर्व खासगी व विश्वस्त संस्थांच्या अखत्यारितील रुग्णालयांनी स्वाईन फ्लूबाधित रुग्णांना उपचारार्थ त्वरित दाखल करणे बंधनकारक आहे. तसेच, या रुग्णांसाठी रुग्णालयात किमान 5 खाटा आरक्षित ठेवण्यात यावीत. रुग्णांना योग्य औषधोपचार, साधनसामग्री उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणी गवळी यांनी केली आहे. या शिवाय ब्युटीपार्लर्स, मॉल्स, नाट्यगृहे, सिनेमागृह यांच्या आस्थापनांनी स्वर्खचाने स्वाईन फ्लू बाबतची जनजागृती करणारे भित्तीपत्रके लावावीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊन नागरिका अधिक दक्षता घेतील व स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव कमी होईल, असे गवळी यांनी म्हटले आहे.
होळी, रंगपंचमीला रुग्णांनी घराबाहेर जाणे टाळावे
होळी आणि रंगपंचमी या सणानिमित्त स्वाईन फ्लू जडलेल्या रुग्णांनी घराबाहेर जावू नये, असे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाने करावे. जेणेकरून ह्या आजाराचा प्रार्दुभाव टाळण्यास मदत होईल, असे गिता गवळी यांनी आरोग्य मंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केले आहे.
