मुंबई (प्रतिनिधी) - महानगरपालिकेच्या नगरसेवकांना विकास कामासाठी निधी देताना महापौरांनी कंत्राटदारांकडून टक्केवारी घेवून निधी वाटप केल्याचा आरोप मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.या विरोधात मनसेच्या दोन नगरसेवकांनी लाच लूचपत खात्याकडे तक्रार दाखल केली असून यामध्ये निधी वाटपाची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
महापौरांवरील आरोपांबाबत पुष्टी देताना संदीप देशपांडे यांनी या निधी वाटपात कंत्राटदारांशी महापौरांनी संगनमत केले असल्याचे ते म्हणाले. पालिकेच्या मुंबईतील २४ वार्डपैकी सर्वात जास्त निधी एल वार्ड, कुर्ला भागातील नगरसेवकांना वाटण्यात आला असून तेथील कंत्राटदारांच्या पत्रावर महापौरांनी निधी वाटप केल्याचा आरोप देशपांडे यांनी केला आहे. इतर २३ वार्ड मध्ये कमी दराने निविदा काढल्याच असताना केवळ एका वार्डमध्ये जास्त दराने निविदा कसे निघतात असा सवाल करताना देशपांडे यांनी ज्या कंत्राटदारांच्या मार्फत नगरसेवकांनी निधीसाठी पत्र दिले आहे.त्यांना निधी देण्याचे स्वतः महापौरांनी आपल्याला सांगितल्याचे स्पष्ट केले. या निधीवाटप गैरव्यवहासंबंधी काही उदाहरणे देताना देशपांडे यांनी सांगितले. आमच नगरसेवक चेतन कदम यांच्या विभागातील गार्डनसाठी यापूर्वाच निधी मंजूर झाला असताना शिवसेना नगरसेविका अनधा म्हात्रे यांच्या पत्रावरून अतिरिक्त निधी दिल्याचे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे मनसे नगरसेवक रुपेश वायगंणकर यांच्या विभागातील तलाव सुशोभिकरणासाठी शिवसेना नगरसेवक रुपेश कोरगावकर यांच्या पत्रावरून ५० लाख मंजूर केले. मुळात वायंगणकर यांनी यासाठी ३० लाख मंजूर केले होते. याचा अर्थ स्वतः नगरसेवकाने पत्रन देताही हा निधी त्या विभागातील नगरसेवकांना देण्याचे कारण काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, महापौरांनी विकास कामांसाठी निधी वाटप करताना नगरसेवकांमध्ये भेदभाव करून भांडणे लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देशपांडे यांनी केला.या निधी वाटपातील भ्रष्टाचार उघडकीस येण्यासाठी आपण मनसेतर्फे लाचलूचपत खात्याकडे तक्रार केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.