वीटभट्टीवर स्थलांतरित मजुरांच्या मुलांच्या शिक्षण हक्कासाठी आज भव्य मोर्चा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

वीटभट्टीवर स्थलांतरित मजुरांच्या मुलांच्या शिक्षण हक्कासाठी आज भव्य मोर्चा

Share This
मुंबई : राज्यातील ठाणे व पालघर जिल्ह्यामधील आदिवासी बांधव रोजगारासाठी स्थलांतर करून वीटभट्टय़ांवर काम करत आहेत. या आदिवासी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न फार गंभीर आहे. शिक्षणापासून वंचित असणार्‍या या हजारो मुलांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी राज्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या नेत्या विद्युल्लता पंडित यांच्या नेतृत्वाखाली वीटभट्टीवर काम करणारी मुले आणि मजुरांचा भव्य मोर्चा सोमवार, ३0 मार्च रोजी आझाद मैदानात धडकणार आहे. 


वीटभट्टय़ांवर काम करणार्‍या मुलांच्या शिक्षणाबाबतच्या समस्या जाणून घेण्यासाठी विधायक संसद या संस्थेने पालघर व ठाणे जिल्ह्यातील काही वीटभट्टय़ांची पाहणी केली. पालघर जिल्ह्यातील वसई व वाडा तसेच ठाणे जिल्ह्यातील भिवंडी या तालुक्यातील काही वीटभट्टीवर काम करणार्‍या ९१२ कुटुंबांची पाहणी केली असता त्यामध्ये ६ ते १४ वयोगटातील बालके वीटभट्टीवर काम करताना आढळली. या पाहणीत तब्बल ७६ टक्के बालके शाळेतच जात नसल्याने निदर्शनास आले. याचाच अर्थ वीटभट्टीवर काम करणार्‍या कामगारांच्या १00 बालकांपैकी ७६ बालके शाळेशिवाय आहेत. एकूणच शिक्षणाचा मूलभूत अधिकार त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही. या बालकांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटावा व त्यांना शिक्षणासाठी सुनियोजित व्यवस्था निर्माण व्हावी, यासाठी वीटभट्टीवर काम करणारे मजूर व त्यांची बालके ३0 मार्च रोजी आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. सक्तीच्या व मोफत प्राथमिक शिक्षण हक्काचा कायदा होऊन पाच वर्षे उलटली, तरी अद्यापि पालघर व ठाणे जिल्ह्यासह राज्यभरातील वीटभट्टय़ा, ऊसतोड कामगार, दगडखाणी इत्यादी क्षेत्रातील स्थलांतरित मजुरांची हजारो बालके त्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून वंचित आहेत. शिक्षण मंत्री वीटभट्टीवरील बालकांच्या डोक्यावरील ओझे उतरवून त्यांना त्यांचा शिक्षणाचा हक्क केव्हा मिळवून देणार, यासाठी हजारो बालके मैदानात 'वीट मोजा' आंदोलन करणार आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages