मुंबई / प्रतिनिधी - उद्योग उभे करताना त्या मध्ये काम करणाऱ्या कामगारांना घरे बांधून देतील अश्या उद्योगांनाच परवानगी द्यावी अशी मागणी भीमाशंकर परिसर विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष किसान गोपाळे यांनी सरकारकडे केली आहे.
एखादा उद्योग सुरु करताना लागणारे कामगार इतर ठिकाणाहून आणले जातात. त्यांची तुटपुंजे वेतन देवून त्यांची बोळवण केली जाते. हे कामगार त्या ठिकाणचे स्थायिक नसल्याने ते त्या कारखान्याच्या भीतीला लागून किंवा जवळपास तंबू, झोपड्या उभारून राहत असतात. जनगणना करताना या कामगारांची नोंद होत असली तरी या कामगारांना पाणी, वीज, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र इत्यादी शासकीय पुरावे मिळवण्यासाठी झगडावे लागत असते. एकीकडे कामगार आपल्या हक्कासाठी आणि कागदोपत्री पुराव्यांसाठी झगडत असताना दुसरीकडे उद्योगपती, कारखान्याचे मालक मात्र कोट्यावधी रुपयांचा नफा कमवत असतात. कारखाना मालक उद्योगपती या कामगारांकडे दुर्लक्ष करत असल्याने अश्या कामगारांना सोयी सुविधा पुरवण्याची जबाबदारी शेवटी शासनावर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर येवून पडत असते. हि शासनावर येवून पडणारी जबाबदारी कमी करण्यासाठी उद्योगांना परवानगी देताना कामगारांना सेवा निवासस्थाने, घरे बांधून देण्याची अट गहालावी अशी मागणी गोपाळे यांनी केली आहे. त्या बाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री, सर्व संबंधित मंत्री, खासदार रामदास आठवले, किरीट सोमैया, आढळराव पाटील, तसेच सर्व राजकीय पक्षांना पाठवले आहे.