भारतररत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंतीचे औचित्य साधून काँग्रेस पक्षाने आज येथील इंदू मीलमध्ये प्रस्तावित बाबासाहेबांच्या भव्य आंतरराष्ट्रीय स्मारकाचे प्रतिकात्मक भूमिपूजन केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण आणि मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील, माजी खासदार एकनाथ गायकवाड, आ. वर्षाताई गायकवाड, माजी आमदार चंद्रकांत हंडोरे, अशोक जाधव, चरणजितसिंह सप्रा, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजन भोसले, मुंबईच्या महिला काँग्रेस अध्यक्षा शीतलताई म्हात्रे आदी नेते उपस्थित होते. काँग्रेस नेत्यांनी इंदू मीलमधील डॉ. आंबेडकरांच्या प्रतीमेला पुष्पांजली अर्पण केली. बाबासाहेबांना अभिवादन करून इंदू मीलच्या भूमिचेही पुष्पपूजन करण्यात आले. स्मारकाचे प्रतिकात्मक भूमिपूजन झाल्याचे जाहीर होताच इंदू मील बाहेर उपस्थित हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोश केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला. कार्यकर्त्यांनी उपस्थितांमध्ये मिठाई वाटून आनंद साजरा केला.
कार्यक्रमानंतर खा. अशोक चव्हाण आणि संजय निरूपम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. केंद्र आणि राज्यातील भारतीय जनता पक्षाची सरकारे हेतुपूरस्सर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिपूजनाला उशीर करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. बाबासाहेबांच्या जयंती दिनी म्हणजे १४ एप्रिलला भूमिपूजन करणार असल्याचे राज्य सरकारनेच जाहीर केले होते. त्यानंतर नेमके याच दिवशी पंतप्रधान व मुख्यमंत्री विदेशात निघून गेले. डॉ. आंबेडकर स्मारकाचा भूमिपूजन कार्यक्रम पूर्वनियोजित असतानाही पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी १४ एप्रिलला विदेशात जाण्याचा निर्णय घेणे अवमानास्पद असल्याने काँग्रेस पक्षाने हा मुहूर्त न चुकवता प्रतिकात्मक भूमिपूजन करण्याचा निर्णय घेतला, असे खा.अशोक चव्हाण म्हणाले. हे स्मारक पूर्णत्वास आणण्याचे दृष्टीने यापूर्वीच्या काँग्रेस आघाडी सरकारने महत्वाची भूमिका बजावली. परंतु, आता साधे भूमिपूजन करण्यासही भाजप सरकार फारसा उत्साह दाखवित नसल्याचे त्यांनी सांगितले. इंदू मीलच्या जागेवर बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभे होईस्तोवर काँग्रेस पक्ष सातत्याने पाठपुरावा करीत राहिल, असे संजय निरूपम यावेळी म्हणाले.
तत्पूर्वी उभय नेत्यांनी चैत्यभूमिला जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यालय टिळक भवन येथेही त्यांना आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते...

.jpg)
.jpg)