मुंबई, सोमवार (प्रतिनिधी)- महापालिकेकडून सतत काढण्यात येणाऱ्या बिलो टेंडरमुळे विकास कामाचा दर्जा घसरत असल्याचा आरोप सर्वपक्षिय नगरसेवकांनी केला. यावेळी ठेकेदाराने केलेल्या कामाची पालिका अभियंत्याअंतर्गत छाणणी करावी, अशी मागणी करण्यात आली.
शहर व उपनगरातील नागरी विकास कामासाठी पालिका निविदा काढण्यात जातात. रस्ते, पदपथ, गटारे, घरगल्लीसह अन्य कामामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी पालिकेने ईनिविदा प्रक्रिया आणली. यामुळे पारदर्शकता आली असली तरी कामाच्या पध्दतीचा दर्जा घसरला असल्याचा आरोप सर्व पक्षियनगरसेवकांनी केला आहे. ई निविदा प्रक्रियेमुळे कंत्राटदार कमी किमतीत कामे करून देण्याचे आश्वासन देऊन निविदा प्रक्रिया मंजूर करून घेत आहेत. मात्र, विकास कामे करताना निकृष्ठ दर्जाचे मटेरिलय वापरत आहेत. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याचा हरकतीचा मुद्दा अपक्ष नगरसेवक इलियास शेख यांनी मांडला. या मुद्द्याला सर्वपक्षिय नगरसेवकांनी पाठिंबा दिला.
यावर, मनसेचे संदीप देशपांडे म्हणाले की, सध्या बिलो टेंडर काढण्याचे प्रमाण वाढले आहे. सत्ताधारी पक्ष पालिका प्रशासनाला पाठिशी घालून बिलो टेंडर मंजूर करीत आहेत. मात्र, याकामाची पहाणी केली जात नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या अभियंत्याकडून कंत्राटदारांनी केलेल्या कामाची छाननी करण्याची गरज असल्याची मागणी देशपांडे यांनी केली आहे. तसेच स्थायी समितीत विरोध केला असताना बिलो टेंडर मंजूर का केले गेले याचे उत्तर स्थायी समिती अध्यक्ष आणि पालिका प्रशासनाने द्यावे, अशी सूचना केली. तर समाजवादी पक्षाचे याकूब मेमन यांनी सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनाने एक जाळे तयार केले असल्याचा आरोप केला. दरम्यान, याबाबत महापौर स्नेहल आंबेकर यांनी मुद्दा राखून ठेवला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या हातात कोलीत दिल्याचे खंत अनेक नगरसेवकांनी व्यक्त केली.
