मुंबई: ३१ मार्च - शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकारची भुमिका सकारात्मक हवी. प्रश्न सर्वच शेतकऱ्यांचे आहेत त्यामुळे सर्व विभागातल्या शेतकऱ्यांना बोनस देऊन सरकारने न्याय द्यावा, अशी मागणी करत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहात नसल्याचा आरोप केला.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या मालिकेमुळे राज्यातल्या प्रत्येक भागातला शेतकरी त्रस्त आहे. शेतकऱ्यांना मदत देऊन त्यांची संपुर्ण कर्जमाफी आणि वीज बील माफी देण्याची मागणी आम्ही अधिवेशनाच्या सुरूवातीपासून सातत्याने करत आहोत. मात्र या प्रश्नी सरकार गंभीर नाही. त्यामुळे आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. एकट्या मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाळीस टक्क्यांनी वाढल्याकडे लक्ष वेधत विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी कापसाला सहा हजाराचा हमी भाव आणि दोन हजार रुपयांच्या बोनसची मागणी केली.
आज विधानसभेत झालेल्या गोंधळाचा फायदा घेत राज्य सरकारने गृह विभागाच्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चा टाळल्याचेही विखे पाटील म्हणाले. आजच अहमदनगर येथे घडलेली घटना ताजी आहे. त्यातच मंत्री कंबरेला उघडपणे पिस्तुले लावून फिरत आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्थेचे दररोज नवनवे प्रश्न निर्माण होत असताना या चर्चेनंतर सरकारचे उत्तर अपेक्षित होते.मात्र ते न देण्याच्या सरकारच्या कृतीचा आपण निषेध करतो असेही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
