मुंबई : सर्व रिपब्लिकन नेते एकत्र येऊन रिपब्लिकन ऐक्य होत असेल तर त्यात सर्व समाजाने सामील व्हावे, रिपब्लिकन ऐक्यातून फुटून वेगळा गट काढणार्यांना आंबेडकरी जनतेने पाठिंबा न देता धडा शिकविला पाहिजे. कायम टिकणारे रिपब्लिकन ऐक्य होणार असेल तर ऐक्यासाठी माझा गट बरखास्त करण्याची आपली तयारी असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्ष ( आठवले गट ) चे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी घाटकोपर येथे केली.
रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांचे ऐक्य झाले की या ऐक्यामागे आंबेडकरी समाजाने ताकदीने उभे राहावे. रिपब्लिकन ऐक्याचे उमेदवार स्वबळावर महापालिका निवडणुकांत विजयी होतील, मात्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये रिपब्लिकन ऐक्याचे उमेदवार निवडून येण्यासाठी सर्व समाजघटकांना रिपाइंत घ्यावे लागेल, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले. आंबेडकरी जनतेच्या प्रखर लढय़ामुळे आणि सर्वसामान्य कार्यकर्ता माझ्या पाठीशी आंदोलनात उभा राहिल्यामुळे इंदू मिल लढय़ाला यश आले, असे ते म्हणाले. या वेळी आठवले यांच्या हस्ते आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचा संविधान ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला.

