मुंबई, शुक्रवार (प्रतिनिधी)- फेरीवाल्यांसबंधी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले असताना पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी टाऊन व्हेंडिंग कमिटीला डावलून फेरीवाल्यांचे चूकीचे सर्वेक्षण केले. त्यामुळे दोन लाख फेरीवाल्यांना सर्वेक्षणातून वंचीत राहवे लागले असून पालिका आयुक्तांनी फेरीवाल्यांना हटविण्यासाठी मॉलधारक, मोठे दुकानदार, भांडवलदारांकडून सुपारी घेतल्याचा आरोप मुंबई हॉकर्स युनियनेचे अध्यक्ष शशांक राव यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच फेरीवाल्यांच्या न्यायहक्कासाठी येत्या जूनमध्ये आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला. मुंबई मराठी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कार्याध्यक्ष अड. महाबळ शेट्टी, सरचिटणीस शंकर साळवी उपस्थित होते.
मुंबईचा विकास आराखड्याच्या त्रुटींवरून कुंटे राजकीय नेते, प्रसारमाध्यमांचे टिकेचे धनी झाले आहेत. आता फेरीवाला धोरण राबविताना मनमानी धोरण अवलंबून न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला. राज्य सरकार व महापालिका फेरीवाल्यांच्या धोरणावर अंमलबजावणीबाबत दुर्लक्ष करीत आहे. आजही फेरीवाल्यांना संरक्षण देण्याएवजी त्यांच्यावर कारवाई केली जाते. आता फेरीवाल्यांना हद्दपार करण्याच्या हालचाली फेरीवाला धोरणातून चालविण्यात येत आहे, असे शंकर साळवी यांनी सांगितले. मात्र, याविरोधात फेरीवाले गप्प बसणार नसून संघर्ष करणार आहेत.
टाऊन व्हेडिंग कमिटीला फेरीवाला धोरण तयार करण्याचे, राबविण्याचे व सर्वेक्षणाचे अधिकार आहेत. परंतु आयुक्तांनी हे सर्व अधिकार धाब्यावर बसवून परस्पर पालिका कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण करून घेतले आहे. यामुळे तीन लाखांवर असलेल्या फेरीवाल्यांचा आकडा 99 हजारांवर आला. टाटा कंपनीच्या 2009 च्या सर्वेक्षणात दीड लाख फेरीवाले आढळले होते, असे राव म्हणाले. त्यामुळे पालिका आयुक्तांनी केलेला हा सर्व चूकीचा असून टाऊन व्हेंडिंग कमिटीमार्फतच सर्वेक्षण केले जावे अशी मागणी केली. तसेच आयुक्तांनी फेरीवाला धोरणाबाबतचा अहवाल परस्पर नगरविकास खात्याकडे पाठविला असून त्यांनी या अहवालाची अमंलबजावणी करून नये. याबाबत 28 एप्रिलपासून आम्ही मुख्यमंत्री, मुंबईतील खासदार, आमदार यांची भेट घेणार असून फेरीवाल्यांच्या समस्या, मागण्यांचे निवेदन देणार असल्याचे राव यांनी सांगितले.

