मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगर पालिकेच्या मतीमंद मुलांसाठी असलेल्या शाळांकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने पालिकेने या मतीमंद विद्यार्थ्यासाठी बेस्टची बस सेवा व रोजगार निर्माण करण्यासाठी आर्थिक तरतूद करावी अशी मागणी समाजवादी पक्षाच्या नगरसेविका दिलशाद आझमी यांनी ठरावाच्या सुचने द्वारे केली आहे.
मुंबई महानगर पालिकेने सन 2015-16 च्या अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठी 2500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पालिकेच्या 18 शाळांमध्ये 800 मतिमंद मुले शिक्षण घेत आहेत. या मुलांच्या शारीरिक आणि मानसिक व्यंगामुळे त्यांच्याकडे विशेष लक्ष पुरवीने गरजेचे असताना या मुलांकडे दुर्लक्ष केले जात आहे. या मुलांना शालेत सोडण्यासाठी आणि शाळेतून आणण्यासाठी कोणतीही परिवहन सेवा पुरवली जात नाही. याचा परिणाम त्यांच्या शाळेतील उपस्थितीवर पडत आहे. ठाणे महानगर पालिकेमध्ये शिवसेना भाजपा युतीची सत्ता असून त्या ठिकाणी मात्र पालिकेने अश्या मुलांना शाळेत आणण्यासाठी व शाळेत सोडण्यासाठी परिवहन उपक्रमाच्या बसची सोय केली आहे. मुंबई महानगर पालिकेनेही ठाणे महानगर पालिकेच्या धर्तीवर पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी बेस्टची बस सेवा सुरु करावी अशी मागणी नगरसेविका दिलशान आझमी यांनी केली आहे. बस सेवे प्रमाणेच या विद्यार्थ्यांसाठी विशेष निधीची तरतूद करावी. या निधी मधून या विद्यार्थ्यांना रोजगार निर्माण करून द्यावा असे आझमी यांनी म्हटले आहे.
