जयंती निमित्त टपाल तिकीट व सोन्याची नाणी काढावीत
मुंबई / अजेयकुमार जाधव
१४ एप्रिल २०१५ ते १४ एप्रिल २०१६ हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती महोत्सवी वर्ष आहे. डॉ. आंबेडकर सामाजिक आणि आर्थिक प्रवर्तन संस्थेच्या ( Dr. Ambedkar Institute of Social and Economic Change ) वतीने हे वर्ष " समता अभियान वर्ष " म्हणून साजरे केले जाणार आहे. या वर्षभरात दलित, आदिवासी, भटक्या विमुक्त जमाती, ओबीसी, स्त्रिया, गरीब उपेक्षित जनतेच्या समस्यांबाबत जन जागरण मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती राज्यसभा खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजीत पत्रकार परिषदेत दिली. डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त टपाल तिकीट तसेच ५ व १० ग्र्याम सोन्याची नाणी काढावीत अशी मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केल्याचे मुणगेकर म्हणाले.
यावेळी बोलताना जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सोपी करावी, भारतात फक्त महाराष्ट्र राज्यात जात पडताळणी कायदा आहे हा कायदा त्वरित रद्द करावा, खोटे जातीचे प्रमाणपत्र देणाऱ्या व घेणाऱ्या व्यक्तीस ५ लाख रुपयांचा दंड अथवा ३ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा देण्यात यावी, अनुसूचित जाती व आदिवासींसाठी असलेली विकास योजना यांच्या धर्तीवर भटक्या आणि विमुक्त जमातींसाठी स्वतंत्र विकास योजना तयार करावी त्यासाठी लोकसंखेच्या प्रमाणात निधीची तरतूद करून क्रीमिलेयरची अट रद्द करावी, अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ ची काटेकोर अमलबजावणी करावी, या कायद्यामधील खटले चालवण्यासाठी फास्ट ट्रयाक कोर्ट सुरु करून खटले त्वरित निकाली काढावेत अशी मागणी मुणगेकर यांनी केली.
विना अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील दलित आदिवासी भटक्या आणि विमुक्त जमातींच्या विद्यार्थ्यांच्या सर्व अभ्यासक्रमांची फी राज्य सरकारने भरावी, विशेष घटक योजना आणि आदिवासी विकास योजनेतील तरतूद करण्यात आलेला निधी त्याच कामासाठी वापरावा इतर ठिकाणी वळवण्यात येवू नये, आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करावी, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या मुस्लिम समाजाला राज्य सरकारने केलेल्या कायद्या प्रमाणे आरक्षण द्यावे, मागासवर्गीय औद्योगिक विकास सहकारी संस्थाना निधी देण्यास्त यावा अश्या मागण्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचे मुणगेकर यांनी सांगितले.
