मुंबई – मागील काही वर्षात मुंबईतील मलेरिया रुग्णांच्या संख्येत ८० ते ८९ टक्क्यांनी घट झाली आहे. मलेरिया आटोक्यात आणण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागासह विविध स्तरांवर उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे भविष्यात मलेरियामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू होणार नाही, असा दावा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी केला आहे. पालिकेच्या सहकार्याने ‘ऑब्झर्वर रिसर्च फाऊंडेशन’ने (ओआरएफ) तयार केलेला अहवाल शुक्रवारी ‘जागतिक मलेरिया दिन’चे औचित्य साधून प्रकाशित करण्यात आला त्यावेळी देशमुख बोलत होते.
२०१० मध्ये मलेरियाने मुंबईत थैमान घातले होते. या वेळी बहुतेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. यात पहिली दोन वर्षे मलेरियाच्या रुग्णांची संख्या वाढतच राहिली, मात्र २०१२पासून या आकडेवारीत मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. २०१२मध्ये मलेरियाचे केवळ १६ हजार ०८६ रुग्ण आढळले होते. त्यापैकी ४५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. २०१३ मध्ये १० हजार ५५० रुग्णांपैकी ३० जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. याशिवाय २०१४ मध्ये ९ हजार ०६८ रुग्णांपैकी १८ जणांना; तर २२ मार्च २०१५ पर्यंत १ हजार ५६५ रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती या अहवालात नमूद करण्यात आली आहे.
मलेरिया हा आजार मुळासकट नष्ट करण्यासाठी येत्या डिसेंबरपासून डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी ‘मॉस्किटो ब्रिडिंग कंट्रोल स्प्रे’च्या माध्यमातून कीटकनाशके उपलब्ध करण्यात येत आहेत. विशेषत: वसाहती, उच्चभ्रू लोकांच्या वस्ती, खासगी कंपन्यांत याचा मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात येणार आहे. याशिवाय मलेरियाचे डास शोधण्यासाठी जाणा-या पालिका कर्मचा-यांना उच्चभ्रू इमारतींत अटकाव केला जातो, मात्र या नव्या योजनेमुळे या मार्ग मोकळा झाला असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

