मुंबई: 4 एप्रिल - परभणी जिल्ह्यात मांत्रिकाने केलेल्या मारहाणीत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेची गृह विभागाने चौकशी करावी आणि आरोपींना अटक करण्यात अपयशी ठरलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
काही दिवसांपुर्वी अहमदनगर येथील नेवासे तालुक्यातील राजेगावमध्ये महिलेला झालेल्या मारहाणीतील आरोपीही पोलीसांना मिळालेले नसल्याचा उल्लेख करत त्यांनी पोलीसांच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले.राज्यात दररोज महिला अत्याचाराच्या एकापेक्षा एक गंभीर घटना उघडकीस येत असून पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होऊनही आरोपींना शाेधण्यात पोलीस अपयशी ठरत अाहेत.परभणीत मांत्रिकाच्या मारहाणीत झालेला महिलेचा मृत्यू ही अतिशय गंभीर बाब असून राज्यात महिला सुरक्षित नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी केला आहे. गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अशा निष्क्रिय पोलीस अधिकाऱ्यांना का पाठिशी घालत आहेत, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले की, राज्यात अंधश्रद्धा निर्मुलनाचा कायदा झाला असतानाही पोलीस या कायद्यान्वये अारोपींवर कारवाई करू शकले नाहीत ही अतिशय गंभीर बाब अाहे.या घटनेला दहा दिवस उलटून गेल्यानंतरही पोलीसांना आरोपी मिळत नाहीत, मात्र तेच आरोपी अटकपुर्व जामिन मिळवण्यात कसे यशस्वी होतात, असा संतप्त सवाल त्यांनी केला. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभुमीवर राज्याच्या पोलीस महासंचालकांवर कारवाई करा आणि राज्याला स्वतंत्र गृहमंत्री द्या अशी मागणी आपण अगोदरच केली अाहे. मात्र त्याबाबत सरकार गंभीर नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले.कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर जोपर्यंत वरिष्ठ पातळीवरून कारवाई होत नाही तोवर कायदा सुवस्थेची राज्यातील परिस्थिती सुधारणार नाही असे सांगत यापुढे एखाद्या जिल्ह्यात महिला अत्याचाराची घटना घडल्यास त्या जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
