ऐक्‍य झाल्यास भाजपची साथ सोडू : आठवले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ऐक्‍य झाल्यास भाजपची साथ सोडू : आठवले

Share This
मुंबई :  रिपब्लिकन पक्षाचे ऐक्‍य होत असेल तर भाजपची साथ सोडायला आपण तयार आहोत. मात्र रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटातटांनी प्रामाणिकपणे एकत्र येण्याची गरज आहे, असे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी गुरुवारी जाहीर केले. बौद्ध विकास संघाच्या सातरस्ता येथील भाई संगारे व नामदेव ढसाळ यांच्या अभिवादन सभेत ते बोलत होते. संगारे व ढसाळ आपले राजकीय गुरू होते, असे आठवले म्हणाले. 

यावेळी बहुजन समाज पक्षाचे डॉ. सुरेश माने, युथ रिपब्लिकनचे नेते व नगरसेवक मनोज संसारे, अविनाश महातेकर, गौतम सोनावणे, तानसेन ननावरे, श्रीकांत भालेराव, राहुल संगारे उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक परिवर्तनाचा विचार व निळा झेंडा हाती घेऊन आम्ही भाजपसोबत राजकीय युती केली आहे. कोणतीही युती कायमस्वरूपी नसते. रिपब्लिकन ऐक्‍यासाठी आपण युती तोडण्यास तयार आहोत, असे आठवले म्हणाले. प्रसंगी मंत्रिपद नाकारण्याची आपली तयारी आहे, असेही ते म्हणाले. एमआयएमच्या पाठीशी मुस्लिम समाज उभा राहिल्याने त्यांचे दोन आमदार निवडून आले. मात्र रिपब्लिकन पक्षाचा एकही आमदार निवडून येऊ शकला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. भाजपला आमची मते जातात. मात्र त्यांची मते आपल्या पक्षाला मिळत नाहीत. यापुढील काळात केवळ बौद्धांच्या मतांवर राजकारण करणे अशक्‍य असून पक्षाला विजय मिळवण्यासाठी सर्व समाजांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. 

भाई संगारे यांनी आयुष्यभर समाजासाठी खस्ता खाल्ल्या. समाजासाठी केलेल्या कामाचा मोबदला त्यांनी कधीही मिळवण्याचा प्रयत्न केला नाही, असे मनोज संसारे म्हणाले. भाईंना युती सरकारच्या काळात मंत्रिपदाची ऑफर होती, मात्र त्यांनी हिंदुत्ववाद्यांसोबत जाण्याचे टाळण्यासाठी ती नाकारली, असे ते म्हणाले. आठवले मंत्री झाले तर रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढेल. त्यामुळे शिवसेना व भाजप त्यांना मंत्री करणार नाही, असा दावा त्यांनी केला. रिपब्लिकन पक्ष सक्षम करण्यासाठी पावले उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. महापौर स्नेहल आंबेकर दलित समाजाच्या असल्याने त्यांच्यावर आरोप करून त्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप संसारे यांनी केला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages