मुंबईत दररोज ८00 दशलक्ष लिटर पाणीगळती व चोरी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत दररोज ८00 दशलक्ष लिटर पाणीगळती व चोरी

Share This
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिन्यांतून बिल्डर आणि टँकरमाफिया दररोज पिण्याच्या पाण्याची राजरोस चोरी करत आहेत. पालिकेच्या अधिकार्‍यांच्या संगनमताने हे सुरू आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुनील अहिर यांनी बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत केला. मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिन्या गेल्या काही महिन्यात सतत फुटल्यामुळे त्यातून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे, असेही ते म्हणाले. त्यांच्या या मुद्दय़ाला सर्व पक्षांच्या सदस्यांनी पाठिंबा दिला व पालिका प्रशासनाला चांगलेच खडसावले.

मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने व अपुरा होत आहे, असे नगरसेवकांनी जल अभियंत्यांच्या निदर्शनास आणले. पालिकेत २४ तास कार्यरत असलेल्या जल अभियंता विभागात विविध संवर्गातील पदे भरण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये कार्योत्तर मंजुरीसाठी आला असता, काँग्रेसचे प्रवीण छेडा यांनी या प्रस्तावाला आक्षेप घेतला. घाटकोपरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक रहिवाशांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्याविषयी तक्रारी करूनही काही सुधारणा होत नाही, असे ते म्हणाले.

बिल्डर आणि टँकर माफिया काँक्रीटचे रस्ते फोडून पाणी चोरी करत आहेत, असा आरोप अहिर यांनी केला. यामुळे झोपड्या व अन्य विभागांना कमी दाबाने पाणी मिळत आहे, असेही ते म्हणाले. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. ठाणे महापालिकेच्या हद्दीतील वागळे इस्टेट, अंधेरी व दहिसर येथे गेल्या काही महिन्यात जलवाहिन्या फुटल्या असून, त्यातून लाखो लिटर पाणी वाया गेले तर अंधेरीत १२ महिने पाण्याची समस्या असताना ती दूर का होत नाही, अशी विचारणा विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केली. विलेपार्ल्यातही पाणीटंचाई आहे, असे भाजपाचे गटनेते दिलीप पटेल यांनी सांगितले. याविषयी आढावा घेऊन उपाययोजना करण्यात येतील, असे आश्‍वासन पालिकेचे जल अभियंता रमेश बांबळे यांनी दिले. टँकर माफिया आणि बिल्डरकडून होणार्‍या पाणी चोरी होत आहे, असे सदस्यांनी निदर्शनास आणले असून, त्याची शहानिशा करण्यात येईल, असे ते म्हणाले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages