मुंबई - राज्यात लागू झालेला गोवंश हत्याबंदी कायदा हा गोर गरिबांवर,अन्नदात्या शेतकऱ्यांवर अन्यायकारक असल्याने या कायद्याचा पुर्नविचार करुन हा कायदा त्वरीत रद्द करावा या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाच्यावतिने संपुर्ण महाराष्ट्रात येत्या 19 मे 2015 रोजी तीव्र आंदोलन छेडणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खा रामदास आठवले यांनी केली आहे.मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत आठवले यांनी आज गोवंश हत्याबंदी कायदा विरोधात राज्यभर आंदोलन करण्याचे रणशिंग फुंकले.राज्यात प्रत्येक जिल्हा व तहसिल कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा रामदास आठवले यांनी केली आहे.
गोवंश हत्याबंदी कायद्याची राज्यात आवष्यकता नसताना हा कायदा लागू करण्यात आला आहे.वास्तविक 1975 पासुन राज्यात लागू असलेला गोहत्याबंदी कायदा योग्य असून त्या कायद्यास कुणाचाही विरोध नाही.गाय हिंदू धर्मात पवित्र असून गोहत्येला सर्वांचाच विरोध आहे.मात्र गोहत्याबंदी कायद्याऐवजी राज्यात लागू करण्यात आलेल्या गोवंश हत्याबंदी कायदा अन्यायकारक असून यास सर्वांचाच विरोध आहे.गोवंश हत्याबंदी कायद्याचा शासनाने पुर्नविचार करावा यासाठी रिपब्लिकन पक्षाने आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे असे आठवले म्हणाले.
गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे राज्यात भाकड जनावरांच्या संगोपनाचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उपस्थीत होणार आहे.यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार असून चर्मोद्योगाससुद्धा मोठ्या प्रमावर आर्थिक फटका बसणार आहे.तसेच बीफ उद्योगामधील कामगारांवर व यात मोठ्या संख्येने असणाऱ्या कुरेशी समाजावरही बेरोजगारीचे संकट कोसळणार आहे.त्यामुळे गोवंशबंदी कायद्याचा शासनाने पुर्नविचार करावा यासाठी रिपाई रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार आहे.राज्यातील प्रत्येक तालूक्यात तहसिल जिल्हा कचेरीवर तीव्र निदर्शने धरणे मोर्चा व आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे रामदास आठवले म्हणाले.

