मुंबई / प्रतिनिधी - मुंबईतील रस्त्यांचा दर्जा चांगल्या प्रकारे राखण्यासाठी मुंबई महापालिकेने सात सल्लागार कंपन्यांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपन्यांच्या देखरेखीत रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर या सल्लागारांची निवड तीन वर्षाकरता होणार असून पर्जन्य जलविभाग आणि मलनि:सारण विभागाकडून अभिप्राय घेणे, भूचाचणी, सविस्तर मोजमाप, लाद्या, पदपथ तसेच पर्जन्य जलवाहिनीचे जाळे मजबूत करण्यासाठी संकल्पचित्रे बनवण्यासाठी सल्लागारांची मदत घेतली जाणार आहे.
मुंबईतील नव्याने हाती घेण्यात येणा-या रस्ते कामांसाठी सल्लागारांची मदत घेतली जाणार आहे. डांबरी, काँक्रिट आणि लहान रस्त्यांच्या कामांसाठी संकल्पचित्र बनवण्यापासून निविदा मागवण्यासाठी अंदाजित खर्च तयार करण्यापर्यंत कामे या सल्लागार कंपन्यांकडून करून घेतली जाणार आहे. त्यासाठी स्प्रेक्ट्रम टेक्नो कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड, श्रीखंडे कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड, टेक्नोजेम कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड, मोनार्च सर्वेयर्स अँड इंजिनीयरिंग कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड, कन्सट्रमा कन्सल्टंसी प्रायव्हेट लिमिटेड, जी. एम. डी कन्सल्टंट, प्रोजेक्ट कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड या सात सल्लागार कंपन्यांचे एक मंडळ तयार करण्यात येत आहे. या सर्व सल्लागारांना परिमंडळनिहाय रस्त्यांचे आराखडे बनवण्याचे काम दिले जाईल.
पालिकेने तीन वर्षापूर्वी सुमारे १२५० रस्त्यांची कामे हाती घेतली होती. यातील ७५० रस्त्यांची कामे पावसाळापूर्व पूर्ण होतील, असा दावा महापालिकेने केला आहे. तर उर्वरित रस्त्यांची कामे पुढील वर्षापर्यंत पूर्ण केली जातील, असे त्यांचे म्हणणे आहे. या सर्व रस्त्यांचे संकल्पचित्र व आराखडे बनवण्यासाठी यापूर्वी सल्लागारांची निवड केली होती. परंतु त्यांची मुदत २५ जून २०१४ पर्यंत संपत आल्याने नव्याने सल्लागारांची निवड होत आहे.

