मुंबई - राज्यातील साडेअकरा कोटी जनतेच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या राज्य पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता व मानसिक ताणतणाव वाढत चालला आहे. त्याच्या अतिरेकामुळे गेल्या ८ वर्षामध्ये तब्बल २४७ खाकी वर्दीवाल्यांनी स्वत:च आपल्या आयुष्याचा शेवट करुन घेतला आहे. बहुतांशजणांनी ड्युटीच्या ठिकाणी त्यांना सरंक्षणासाठी दिलेल्या शस्त्राने स्वत:वर गोळी झाडून घेतलेल्या आहेत.
आत्महत्या करणाऱ्या पोलिसांमध्ये अधिकाऱ्यांची संख्या ६३ वर आहे. तर उर्वरित कॉन्स्टेबलपासून ते सहाय्यक फौजदारा आहेत. या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात ६ जणांनी आयुष्याचा संपविले आहे. शनिवारी रात्री वाकोला पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार दिलीप शिर्के यांनी वरिष्ट निरीक्षक विलास जोशी व त्यांचा आर्डली बाळासाहेब अहिर यांच्यावर गोळी झाडून स्वत: आत्महत्या केली. याप्रकरणामुळे मुंबईसह पुर्ण राज्य पोलीस दलात खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोलिसांच्या आत्महत्याबाबत गृह विभागाकडून माहिती घेतली असता दरवर्षी त्यांच्या आत्महत्येचा आकडा वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वरिष्ठ अधिकारी, सहकाऱ्यांकडून होणारी पिळवणूक, ड्युटीवर बंदोबस्त, कामाचा अतिरक ताण, आणि कौटुंबिक कलह ही त्यामागील प्रमुख कारणे असल्याचे त्याबाबत केलेल्या तपासातून पुढे आल्याचे असल्याचे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. राज्यात सर्वच प्रकारच्या गुन्ह्याच्या आलेख वाढत राहिला आहे. त्याला प्रतिबंधासाठी अद्यावत यंत्रसामुग्रीसह मनुष्यबळ वाढविण्याचे प्रयत्न सरकारकडून एकीकडे होत असताना खात्यातंर्गत संदोपसंदी, गटबाजी वाढत राहिलेली आहे. अवेळी, सलगपणे करावी लागणारी ड्युटी, विविध प्रकारच्या बंदोबस्त हक्कामुळे साप्ताहिक सुट्ठीवर येणारी गदा,वरिष्ट अधिकाऱ्यांची मनमानी, त्रासामुळे अधिकारी,कर्मचाऱ्यांवरील मानसिक तणाव वाढत राहिले आहे.त्याचा परिणाम कुटुंबावर, वैयक्तिक जीवनावर होत आहे. कौटुंबिक कलह वाढल्याने परिणामी रुबाबदार, प्रतिष्टेची नोकरीतील उर्वरित सेवा, कुटुंंबाचा विचार न करीत आत्महत्या करण्याची मनोवृत्ती वाढली आहे.

