मुंबई / प्रतिनिधी - केंद्र शासनाने एक जून 2015 पासून संपूर्ण देशभर पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना व अटल निवृत्तिवेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.या अनुषंगाने येत्या शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली तर बारा जिल्ह्यांत पालकमंत्री या विमा योजनांचे उद्घाटन करणार आहेत.
प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना ही एक वर्षाचे विमा संरक्षण असणारी अपघात विमा योजना आहे. दरवर्षी याचे नूतनीकरण करण्यात येईल. सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांच्या मदतीने या योजना काढली जाणार आहे. 18 ते 70 वयोगटातील सर्व बचत बॅंक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतील. विमा उतरवणाऱ्या व्यक्तीचा आधार क्रमांक पायाभूत मानला जाईल. योजनेचा कालावधी दरवर्षी 1 जून ते 31 मे असा राहील. विमा हप्ता बॅंक खात्यात परस्पर नावे टाकला जाईल. यामध्ये भरपाई मृत्यू झाला तर दोन लाख रुपये वारसांना, दोन्ही डोळे, दोन्ही पाय निकामी अथवा गंभीर दुखापत होऊन कायमचे अपंगत्व आले तर दोन लाख तर एक डोळा, अथवा एक पाय निकामी झाला तर एक लाख रुपये भरपाई मिळणार आहे. यासाठी विमा हप्ता प्रती वर्षे बारा रुपये इतका राहील.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत 18 ते 50 वयोगटातील सर्व बचत बॅंक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतील. याचा कालावधी 1 जून ते 31 मे असा राहील. मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये विमा हप्ता प्रतिव्यक्ती प्रती वर्षे 330 रुपये असा राहील. या योजनेत कोणत्याही प्रकारे मृत्यू झाला तर लाभ मिळणार आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या विम्याचे संरक्षण राहणार आहे. असंघटित क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्तींसाठी अटल निवृत्तिवेतन योजनादेखील 1 जून 2015 पासून सुरू केली आहे. यामध्ये 40 वर्षांच्या आतील व्यक्तीस सहभागी होता येईल. सहभागी व्यक्तींना 60 वर्षानंतर त्यांनी भरलेल्या रकमेनुसार 1000 ते 5000 हजार दरमहा निवृत्तिवेतन दिले जाणार आहे. येत्या शनिवारी कोल्हापूर, रत्नागिरी, सोलापूर, मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, अमरावती जळगाव या जिल्ह्यांत या योजनांचे उद्घाटन संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री करणार आहेत.

