मुंबई - ना महागाई कमी झाली, ना काळा पैसा भारतात आला, पेट्रोल-डिझेल दरवाढ, रेल्वे, बस भाडेवाढ, शेतक-यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, महागाईचा भस्मासुर तरीही एकच लक्ष्य परदेश दौरे.. मोदी सरकार.. एकदम बेकार, अशा जोरदार घोषणा देत कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबई दणाणून सोडली. गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानापर्यंत भव्य मोर्चा काढून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.
हजारोंच्या संख्येने कॉँग्रेसचे कार्यकत्रे या मोर्चात सामील झाले होते. आझाद मैदानात या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले यावेळी बोलताना कॉँग्रेसचा जन्मच मुळात सत्तेपेक्षा संघर्षासाठी झाला आहे. स्वातंत्र्यसंग्रामापासून ते गरिबांच्या प्रश्नांसाठी पक्ष नेहमीच लढत आला आहे. जनतेला आश्वासने देऊन त्यांची घोर फसवणूक करणा-या मोदी सरकारला कॉँग्रेस सोडणार नाही. मोदी सरकारला धडा शिकविण्यासाठी वेळ पडल्यास रक्तदेखील सांडू, असा इशारा पक्षाचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी येथे दिला.
मोदींनी सत्तेत येण्यापूर्वी रोजगार देण्याचे,परदेशातील काळापैसा देशात आणण्याचे, महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यापैकी एकाचीही पूर्तता त्यांनी वर्षभरात केली नाही. तसेच सत्तेत आल्यावर पाकिस्तानला वटणीवर आणू असे छातीठोकपणे सांगणा-या मोदींच्या कारकिर्दीत भारतात सीमेपलीकडून गोळीबार वाढला आहेत. तेव्हा मोदी सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. या सरकारला कॉँग्रेस धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. लाठी, काठया आम्ही खाल्ल्याच आहेत. वेळ पडल्यास रक्तही सांडू, असा इशारा त्यांनी दिला.

