टॉवर्सचा मालक असलेल्या पत्रकाराविरोधात रहिवा शी जनआंदोलन करणार
मंत्री प्रकाश मेहता यांचे पत्र केराच्या टोपलीत
मुंबई / अजेयकुमार जाधव
घाटकोपर रमाबाई आंबेडकरनगर येथे गेल्या काही वर्षात अनधिकृत मोबाईल टॉवर्स उभारण्यात आले आहेत. मोबाईल टॉवर्समुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका असल्याचे आरोग्य क्षेत्राकडून वेळोवेळी सांगण्यात येत असले तरी पालिकेचे एन विभाग कार्यालय, पंतनगर पोलिस ठाणे आणि जिल्हाधिकारी कार्यालय अनधिकृत मोबाईल टॉवर्सवर कारवाई करण्यास दुर्लक्ष करत आहे. पालिका, जिल्हाधिकारी, आणि पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत असताना मोबाईल टॉवर्सच्या मालक असलेल्या पंकज गुप्ता याने आपण एका च्यानेलचा पत्रकार असल्याचे सांगत रहिवाश्यांविरोधात खोट्या तक्रारी करून रहिवाश्यांना त्रस्त करून सोडले आहे. पोलिस आणि पालिका प्रशासनाच्या आशिर्वादाने रहिवाश्यांची पिळवणूक सुरु असताना न्याय मिळत नसल्याने त्रस्त रहिवाश्यांनी आता जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
रमाबाई आंबेडकर नगर येथे सन २०१० पासून अनधिकृत मोबाईल टॉवर्स उभारण्यात आले आहेत. या अनधिकृत मोबाईल टॉवर्सवर कारवाई कारवाई म्हणून येथील नागरिक मुंबई महानगरपालिकेच्या एन विभाग कार्यालय, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेले ५ वर्षे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. रहिवाश्यांच्या पाठपुराव्यामुळे रमाबाई आंबेडकर नगर मधील अनधिकृत मोबाईल टॉवर्सवर पालिका, जिल्हाधिकारी कार्यालयाला कारवाई करावी लागणार होती. यामुळे अनधिकृत मोबाईल टॉवर्स उभारनाऱ्या पंकज गुप्ता नावाच्या व्यक्तीवर एम.आर.टी.पी. कायद्यानुसार कारवाई करत असल्याचे रहिवाश्यांना दाखवण्यात आले. परंतू न्यायालयात टॉवर्सच्या मालक असलेल्या पंकज गुप्ता विरोधात केस सुरु असताना पालिका आणि पोलिस प्रशासनाचे वकील हजर राहत नसल्याने सदर केस रद्द करण्यात आली.
न्यायालयातून एम.आर.टी.पी.ची के स रद्द होताच मोबाईल टॉवर्सच्या पंकज गुप्ता या मालकाने पोलिसांना हाताशी धरून आपल्या विरोधात तक्रार करणाऱ्या रहिवाश्यांवर खोट्या केसेस टाकून त्रास देण्यास सुरुवात केली आहे. अनधिकृत मोबाईल टॉवर्स उभारणाऱ्या पंकज गुप्तावर कारवाई करायचे सोडून पोलिस देखील रहिवाश्यांना त्रास देवू लागले आहे. एकीकडे अनधिकृत मोबाईल टॉवर्स उभारणारा पंकज गुप्ता खोट्या केसेस टाकून रहिवाश्यांना सतावत आहेत, दुसरीकडे पोलिसांनीही अन्याय होणाऱ्यांना नागरिकांना न्याय द्यायचा सोडून अन्याय करणाऱ्या पंकज गुप्तालाच पाठीशी घालण्याचा प्रकार सुरु ठेवला आहे. पालिकेचे एन विभाग कार्यालय मंत्री व स्थानिक आमदार असलेल्या प्रकाश मेहता यांचे आदेश पाळत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
संतप्त झालेल्या रहिवाश्यांनी नम्रता एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून राज्यपाल, मुख्यमंत्री, खासदार किरीट सोमैया, गृहनिर्माण मंत्री व स्थानक आमदार प्रकाश मेहता, विरोधी पक्ष नेते विधान सभा, विधान परिषद, मुंबई महानगर पालिका आयुक्त, मुंबई पोलिस आयुक्त, पोलिस उप आयुक्त परिमंडळ ७, पालिका एन विभाग कार्यालय, पंतनगर पोलिस ठाणे यांना निवेदन देवून रहिवाश्यांचा त्रास त्वरित थांबवून न्याय देण्याची तसेच अनधिकृत मोबाईल टॉवर्सचा मालक पंकज गुप्ता व इतर मोबाईल टॉवर्स मालकांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. रहिवाश्यांना न्याय न मिळाल्यास येणाऱ्या दिवसांमध्ये रहिवाश्यांकडून मोठे जनआंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निवेदनात दिला आहे.
मंत्री प्रकाश मेहतांचे पत्र केराच्या टोपलीत
रहिवाश्यांनी स्थानिक आमदार व मंत्री असलेले प्रकाश मेहता यांना रहिवाश्यांची कशी पिळवणूक सुरु आहे याचे सविस्तर पत्र दिले आहे. या पत्राला अनुसरून मंत्री असलेल्या प्रकाश मेहता यांनी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्तांना २२ जानेवारी २०१५ ला पत्र पाठवून अनधिकृत मोबाईल टॉवर्सच्या मालकावर त्वरित कारवाई करावी व अनधिकृत मोबाईल टॉवर्स उभारणाऱ्यावर कारवाई करावी असे निर्देश दिले होते. परंतू मंत्री असलेल्या प्रकाश मेहता यांनी पत्र पाठवूनही अद्याप पालिकेने कोणतीही कारवाई केलेली नाही. राज्याच्या क्याबिनेट मंत्री असलेल्या प्रकश मेहता यांनी आयुक्तांना पत्र देवूनही कारवाई होत नसल्याने मंत्र्यांचे पत्र पालिका आयुक्त व एन विभाग कार्यालयाने केराच्या टोपलीत टाकले कि काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

