मुंबई (प्रतिनिधी)- पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय वस्तू या दर्जाहीन असल्याची टीका शिक्षण समिती अध्यक्षा रितू तावडे यांनी केली. आज मुख्यालयात २७ शालेय वस्तूंचचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
पालिका शाळांचा दिवसेंदिवस दर्जा घसरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गळती होत आहे. ही गळती रोखण्यासाठी पालिका दिवसेंदिवस नवनवीन उपक्रम राबविते. दरवर्षी 27 शालेयपयोगी वस्तूमध्ये पुस्तके, बुट, छत्री, गणवेश, पाणी बॉटल, डब्बा, रेनकोट, दप्तरसह अन्य वस्तूंचा सहभाग असतो. या शिवाय, व्हच्यूअल क्लासरुम, एकलव्य अभ्यासिका आणि यंदा प्रथमच टॅब देणार आहे. दरवर्षी शाळा सुरु होण्यापूर्वी पालिका २७ यावस्तूंचे वाटप करते. मात्र, अनेकदा ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नाहीत, अशी ओरड असते. तसेच या वस्तूंचा दर्जाही निकृष्ठ असतो. कोट्यवधी रुपये खर्च करूनही पालिका विद्यार्थ्यांना निकृष्ठ वस्तूंचा पुरवठा करते. त्यामुळे रितू तावडे यांनी या वस्तूंचा दर्जा तपासण्यासाठी वस्तूंचे सादरीकरण केले. यावेळी शालेय दप्तर, डब्बा, पाण्याची बॉटल, गणवेश, रेनकोटचा दर्जा खालावलेला असल्याची टीका केली. यात सुधारणा करून शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना वस्तू ठराविक वेळेत मिळतील, याची काळजी घेण्याची सूचना केली. तसेच वह्यांवर पालिकेचे छायाचित्र लावण्यात यावे, जेणेकरून विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढेल, असा आशावाद व्यक्त केला. तसेच विद्यार्थ्यांना वस्तू मिळतात की नाही याबाबत आपण स्वतः जावून चौकशी करणार असल्याची सूचना अधिकाऱ्यांना केली आहे.
प्रि- बीड बैठकीतून समिती अध्यक्षांना वगळले
पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या वस्तूंबाबत प्रि- बीड बैठक घेतली जाते. या बैठकीत शालेय वस्तूंवर चर्चा केली जाते. २५ मे २०१५ रोजी पालिका उपायुक्त, शिक्षणाधिकारी आणि मध्यवर्ती खरेदी प्राधिकरण यांची एक बैठक झाली. या बैठकीतून मात्र शिक्षण समिती अध्यक्षांना वगळण्यात आले. गेल्या काही वर्षापासून हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे हैराण झालेल्या तावडे यांनी पालिका उप आयुक्त (शिक्षण) रमेश पवार यांच्याकडे प्रि- बीड सभेचा अहवाल मागविला आहे. तसेच प्रि- बीड बैठकीत यापूढे सामिल करण्याचे ही आदेश दिले आहेत.

