मुंबई : ९ मे - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपुर्वी भाजपने केंद्रात आणि राज्यातील सत्तेत दहा टक्के वाटा देण्याच्या दिलेल्या लेखी आश्वासनाचा त्यांना आता विसर पडला आहे. मात्रभाजपने मित्रपक्षांना दिलेला शब्द पाळावा. सध्या तरी सरकारचा पाठिंबा काढण्याचाकोणताही विचार आम्ही केलेला नाही, मात्र सत्तेचा योग्य तो वाटा मिळणार नसेल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, अशी भुमिका रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी सर्व मित्रपक्षांच्या वतीने जाहीर केली. आज मुंबईतील वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये महायुतीतील मित्र पक्षांच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता स्थिरस्थावर झाल्यानंतरही निवडणुकीपुर्वी आपल्यालाकबुल केल्याप्रमाणे सत्तेतला वाटा देण्यास भाजप टाळाटाळ करत असल्याने सरकारसोबतराहायचे की नाही याबाबतची भुमिका ठरवण्यासाठी आज मुंबईत रिपाई, स्वाभिमानीशेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम या संघटनांच्या नेत्यांची बैठक पार पडली. सरकारला सत्तेवर आणण्यात आपला वाटा महत्वाचा होता, त्यामुळे आता सत्तेत आल्यानंतर सत्तेतील योग्य वाटा मिळण्यासाठी काय केले पाहिजे याबाबतची विस्तृत चर्चा या बैठकीत करण्यात आली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत रिपाईचे अध्यक्ष आणि या बैठकीचे समन्वयक मा. रामदास आठवले यांनी चारही मित्र पक्षांची भुमिका स्पष्ट केली. आमची सरकार विरोधाची भुमिका नाही.मात्र भाजपने दिलेली लेखी आश्वासने पाळली पाहिजेत. मित्रपक्षांपैकी चार जणांना मंत्रीपदे , विविध महामंडळे आणि शासकीय समित्यांमध्येही योग्य ते प्रतिनिधीत्व मिळावे अशी आमची अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.आपण सरकारला याबाबत काही डेडलाईन देत आहात का, अशी विचारणा मा. रामदासआठवलेंना केली असता ते म्हणाले की, "सध्या तरी डेडलाईन नाही पण सरकारलालाईफलाईन देण्याचा विचार आहे. ' याबाबत लवकरच आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही मा. आठवले यांनी सांगितले.
तर स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आपापसातले प्रश्न मार्गी लावण्यासाठी महायुतीतील सहाही पक्षांच्या प्रतिनिधींची एक समन्वय समिती नेमण्याची मागणी केली. आपण दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांच्या शब्दाखातर महायुतीत सामिल झालो होतो. अशा स्थितीत त्यांची कमतरता आम्हाला जाणवत असल्याचे मा. शेट्टीम्हणाले. मित्र पक्षांना सत्तेतला वाटा देण्याबाबत वरिष्ठांशी चर्चा सुरू असल्याचे भाजप नेतेसांगतात, मात्र आश्वासने देताना भाजपच्या नेत्यांनी वरिष्ठांना विचारले होते काय, असासवाल करत मा. खासदार शेट्टी म्हणाले की, यापुढे आम्ही भाजपमध्ये ज्यांना निर्णयाचे अधिकार आहेत अशा व्यक्तीशी चर्चा करू. आता विचार करण्याऐवजी शब्द देताना विचार करावयास हवा होता असा टोलाही मा. शेट्टी यांनी भाजपला लगावला. याशिवाय भाजपला फक्त पाच वर्षांचे राजकारण करायचे आहे का? किंवा त्यांना मित्र पक्षांना काही द्यायचे नसेल तर त्यांनी स्पष्टपणे तसे सांगावे, अशा स्पष्ट शब्दात शेट्टी यांनी मित्रपक्षांच्या वतीने बाजूमांडली.
रासपचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनीही मित्रपक्षांशी भाजप जी वर्तणुक करत आहे त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. आमचे लोक भलेही निवडून आले नसतील मात्र आमच्या किमान ५ टक्के मतांमुळे तुमचे अनेक उमेदवार निवडून येऊ शकले याची जाणभाजपने ठेवावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आम्ही सत्तेसाठी दबाव टाकतो आहोत अशी आमच्यावर टीका केली जाते पण मग तुमचा अट्टहाससुद्धा सत्तेसाठीच आहे ना असा उपरोधिक सवालही त्यांनी केला. तर सत्तेचा कोणताही लाभ आम्हा मित्र पक्षांना झाला नसल्याचे सांगत शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष मा. विनायक मेटे म्हणाले की, आमच्याकार्यकर्त्यांनाही सत्तेत सामावून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी भाजपने आमच्याशी चर्चा करणेगरजेचे आहे. सरकार आणण्यात आमची भुमिका मोलाची होती, त्यामुळे आता सत्ता आल्यावरही आपण एकत्र असले पाहिजे, असे सांगत त्यांनी सत्तेतल्या दहा टक्के वाट्याच्या मित्रपक्षांच्या मागणीचा पुनरुच्चार केला.
या बैठकीत रिपाईच्या वतीने अध्यक्ष. रामदास आठवले, अविनाश महातेकर, तानसेन ननावरे हे उपस्थित होते. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, रविकांत तुपकर, मा. वर्षा काळे, रमेश भोसकर आणि योगेश पांडे हे मान्यवर सहभागी झाले होते. राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर, बाळासाहेब रोडटक्के, दशरथ राऊत आणि अजित पाटील आदी नेते उपस्थित होते. तर शिवसंग्रामच्या वतीने अध्यक्ष विनायकराव मेटे, तानाजीराव शिंदे, रमेश आंब्रे, विक्रांत आंब्रे, विनोद साबळे आणि राजेंद्र म्हस्के आदी नेतेमंडळी उपस्थित होते.

